फक्त शेगडी मिळाली; मोबाईल चार्जिंगसाठी लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 09:54 PM2019-04-15T21:54:29+5:302019-04-15T21:55:03+5:30

सातपुड्यातील आदिवासींचा संघर्ष अजूनही रोजच्या जगण्याशी; निवडणुकीचे सोयरसूतक नाही

Only got a grate; Money required for mobile charging | फक्त शेगडी मिळाली; मोबाईल चार्जिंगसाठी लागतात पैसे

फक्त शेगडी मिळाली; मोबाईल चार्जिंगसाठी लागतात पैसे

Next


मिलिंद कुलकर्णी
काठी (जि.नंदुरबार) : शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते, त्यामुळे टी.व्ही.तर सोडा जगाशी संपर्क साधणाऱ्या मोबाईलच्या चार्जिंगसाठी मोठ्या गावात जाऊन दहा रुपये मोजावे लागतात...हे चित्र आहे सातपुडा डोंगरातील आदिवासी पाड्यांमधील. लोकसभा निवडणुका, केंद्र सरकारच्या घोषणा, विरोधी पक्षांचे आरोप, स्थानिक उमेदवार याविषयी काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयवंतराव नटावदकर यांचे पूत्र डॉ.सुहास नटावदकर यांनी केलेली बंडखोरी, ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेल्या माणिकराव गावीत यांच्याऐवजी काँग्रेसने आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना दिलेली उमेदवारी, भाजपच्या डॉ.हीना गावीत या दुसऱ्यांदा अजमावत असलेले नशिब याविषयी माध्यमांमध्ये चर्चा असली तरी सातपुड्याच्या दुर्गम भागात निवडणुकीचे काहीही वातावरण नाही. वडफळ्या, मोलगी, विसरवाडी, खांडबारा अशा मोठ्या गावांमध्ये थोडी फार चर्चा दिसून येते, पण पिंपळखुटा, काठी, खर्डा, मुंदलवड, हरणखुरी याठिकाणी निवडणुकीचा विषयही चर्चेत आला नाही.
दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे उन्हाळ्यातील प्राधान्यक्रम वेगळेच आहेत. भोंगºया बाजार, होळी आणि मेलदा उत्सव गेल्याच महिन्यात आटोपले. या उत्सवाच्या निमित्ताने मध्य प्रदेश, गुजराथमध्ये मजुरीसाठी स्थलांतर केलेले महिला-पुरुष परतले आहेत. परतल्यावर पहिल्यांदा भेडसावतोय तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्प राबविलेल्या मोजक्या गावांमध्ये पाण्यासह काही सुविधा झाल्या आहेत, पण शासकीय सुविधा नावालाच आहेत. कुठेतरी हायमास्ट लॅम्पचा पोल दिसतो, तर एखाद्या गावात हातपंप दिसतो. उज्ज्वला योजनेची शेगडी मिळाली, पण गॅस हंडी अद्याप मिळाली नसल्याची काही गावांमध्ये स्थिती आहे. पारंपरिक उर्जा पोहोचू शकत नसल्याने वनविभागाने काही गावांमध्ये सौर दिवे आणि प्लेट दिल्या आहेत.
काठी गावातील संस्थानिकांची होळी प्रसिध्द आहे. देशविदेशातील नागरिक ती बघायला आवर्जून येतात. होळीचे मैदान पेव्हर ब्लॉक बसवून चकचकीत केले आहे. पण अर्ध्या दिवसापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा नसतो. मोबाईल चार्जिंगसाठी मोलगी या मोठ्या गावात जाऊन दुकानदाराला १० रुपये द्यावे लागतात. इन्व्हर्टरच्या मदतीने एकावेळी ५-६ मोबाईल चार्र्जींग केले जातात. हा नवीन व्यवसाय याठिकाणी सुरु झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या शहरी भागात टपºया,दुकानांवर मिळतात, तसे येथील गावांमध्ये त्याच बाटल्यांमध्ये पेट्रोल विकायला ठेवलेले असते. मोटारसायकल हे सर्वाधिक वापरले जाणारे वाहन असल्याने पेट्रोल हे अत्यावश्यक झालेले आहे. जगाशी संपर्क साधायचा असेल तर रेंज मिळत नसल्याने डोंगरावर जावे लागते. रेंज स्पॉट तयार झाले असून तेथे जाण्यासाठी पायवाट तयार झाली आहे.
महू आणि आमचूरचा व्यवसाय आता सुरु होईल, त्यासोबतच खरीप हंगामाची तयारी करण्यात आदिवासी लोक व्यग्र आहेत.
पंच, सरपंच हे सांगतील, त्याला मतदान केले जाईल, असा सूर पाड्यांमधील आदिवासी बांधवांमधून उमटला. निवडणुकीचा शहरातील धुराळा दुर्गम भागात पोहोचलाच नसल्याचे चित्र आढळून आले.
कार्यकर्ते संभ्रमित
नंदुरबार जिल्ह्याची सत्ता गावीत, नाईक, पाडवी अशा मोजक्या ८-१० कुटुंबामध्ये विभागलेली आहे. ग्रामपंचायतीपासून तर खासदारकीपर्यंत याच कुटुंबामधील सदस्य पदावर असतो. शिक्षणामुळे जागरुकता आलेल्या युवकांमध्ये आता असंतोष, संभ्रम अशा संमिश्र भावना दिसून येतात. काही संघटना म्हणूनच निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. मात्र त्यांचा प्रभाव अल्प आहे.

Web Title: Only got a grate; Money required for mobile charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.