लोकमत 'वसंतोत्सव' : पुनश्च वसंत कानेटकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 05:55 PM2018-03-05T17:55:09+5:302018-03-05T17:59:48+5:30

वसंत कानेटकर यांची नाटके पुनः पुन्हा पाहावीत, वाचावीत, अशीच आहेत.

Lokmat 'Vasantotsav': Playwriter and Novelist Vasant Kanetkar | लोकमत 'वसंतोत्सव' : पुनश्च वसंत कानेटकर 

लोकमत 'वसंतोत्सव' : पुनश्च वसंत कानेटकर 

googlenewsNext

-   रवींद्र वासुदेव गाडगीळ

शनिवारी आपण वसंत कानेटकर ह्यांची माहिती वाचलीत, परंतु एका लेखात पूर्ण होणारी नाही, हे लक्षात घेता आज पुनश्च वसंताख्यान पुढे सुरू करतोय.  

नाटक ‘कस्तुरिमृग’ - कलावंतिणीच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. एक बंडखोर कन्या परंपरेने चालत आलेले कलावंतिणीचे नीरस आयुष्य झुगारून देऊन, सुंदर गृहिणी बनून, घरगृहस्थित राहण्याच्या स्वप्नांच्या कोशात वावरते. परंतु समाज व तिचे नातेवाईक तिला या कोशातून सुंदर फुलपाखरू बनून स्वच्छंद विहार करावयास देत नाहीत. उलट, अळी स्वरुपात असतानाच तिला त्याच नरकात ढकलून मारून टाकतात. अळीमिळी गुपचिळी असा हा मामला असतो. ती मात्र ह्या चाकोरी बाहेरचे जीवन जगू इच्छिते. घाणेरडे जीवन झुगारायला बघते. परंतु हा बीनचेहर्‍याचा समाज तिला पुनः पुन्हा त्याच गटारात ढकलतो. मन जुळायला कदाचित एक क्षणदेखील पुरत असेल, पण कळायला मात्र कधी कधी आयुष्य देखील थिटे पडते. त्यातच तिला पुरूषांचे फार वाईट अनुभव येतात. सगळे पुरुष सारखेच, बिनचेहेर्‍याचे अन सगळ्याच बायका बिनपायाच्या. ती आर्ततेने ईश्वराला साद घालते अन विचारते “हे देवा, कावळ्याच्या घरात जन्म दिलास मग हे सोनेरी पंख का दिलेस?”. मुळात ती दिसायला सुंदर, त्यात वागणेही सुंदर अन विचारही. “रस्त्यात कुठेही उभ राहून मचमचा खाण्याला चरणे म्हणतात. सुग्रास भोजनाचा स्वाद घ्यायचा तर प्रियजनांची पंगतच हवी. पाटासमोर केळीचे हिरवेगार पोपटी पान, पानाभोवती वेलबुट्टीची रांगोळी हवी. उदबत्तीचा मंद, मधुर सुगंध दरवळता हवा. पार्श्वभूमीला सनईचे मंजुळ सूर, जेवायला बसलेल्या पाव्हण्यांच्या कपाळी केशरी गंधाचे सोनसाखळीने आडवे गंधलेपन. अन्न वाढणारे हातही समाधानी, प्रेमळ व सुंदर हवेत. पंगतीच्या श्लोकांची म्हणण्यासाठी चाललेली चढाओढ, या अशा एका वेगळ्याच वातावरणाची तिला ओढ लागली होती. कुठल्यातरी मंदिरात सोडलेल्या देवदासीची मुलगी असावी बहुतेक,म्हणूनच दोन्ही प्रकारचे वातावरणात तिचा वावर असावा. पण आजूबाजूचे, माणसे कसली, पशूच ती! ते तिला जगू देत नव्हती. अशाप्रकारे तिचा आणि त्या नाटकाचा करुण शेवट होतो.

किती सुंदर हे नाटक. ह्याचा पहिला प्रयोग १९७६ मध्ये शिवाजी मंदिर येथे झाला. दिग्दर्शक श्रीराम लागू, संगीत,पार्श्वगायक हृदयनाथ मंगेशकर,प्रकाश घांग्रेकर,शरद जांभेकर,वर्षा भोसले. सुत्रधार मोहन तोंडवळकर,कलाकार- रोहिणी हट्टंगडी,मोहन गोखले,विठ्ठल जोशी,मधुकर नाईक,लीलाधार कांबळी,नंदा फडके,बाळ बापट आणि...... श्रीराम लागू...ते तर तब्बल चार भुमीकांमध्ये. सादरकर्ते होते ‘कलावैभव’ पथक,मुंबई.

‘मला काही सांगायचेय’– ह्या नाटकात बघायला मिळते, ती  ‘श्रद्धानंद’ महिला आश्रमांमधील ऐकिव पण घडलेली गोष्ट! यात एका स्त्रीच्या मनातील घालमेल दाखवली आहे. शिस्तीत कधीच काही बसत नाही. माणसांचे स्वभाव आणि स्वभाव घडवणारी, बिघडवणारी परिस्थितिदेखील! अजाण भाबड्या स्त्रीला मोहात पाडतात ते पुरुषच आणि मोहात पडून ती फसली म्हणजे तिचा छळ मांडून तिला जीव नकोसा करतात ते देखील पुरुषच! प्रायश्चिताशिवाय अपराधाचे परिमार्जन होत नाही आणि चटके बसल्याशिवाय माणसांना शहाणपण येत नाही हे खरेच!

ह्या नाटकाचा पहिला प्रयोग नाट्यसंपदा, मुंबईतर्फे १९७० साली साहित्य संघात झाला. दिग्दर्शक- पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर, संगीत-पं. जितेंद्र अभिषेकी, नेपथ्य- रघुवीर तळाशीकर, भूमिका- प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर,जगन्नाथ कांडळगावकर,आप्पा गजमल,गिरीश पेंढारकर,वैजयंती फाळके,दिलीप कुरतडकर,चंद्रचूड वासुदेव, स्वाति काळे, डॉ.काशीनाथ घाणेकर.

‘वादळ माणसाळतंय’- जगप्रसिद्ध आनंदवनाचे शिल्पकार आणि महामानव बाबा आमटे यांच्या रोमांचकारी, अद्भुत आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्वावरचे नाटक. त्यांचं वादळी व्यक्तिमत्व व वादळी विचारधारा, त्यांच्या वृत्तीतील प्रचंड अस्वस्थता, विचारांची आणि कल्पनांची कारंजी उडवणारे त्यांचे वेगवान बोलणे, सतत नवनवी स्वप्ने पाहणारी त्यांची कल्पनाशक्ति, दुर्दम्य आशावाद, अशा मनस्वी व विविधरंगी व्यक्तिमत्वाचे नाटक. आनंदवन येथील कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य  बघून कानेटकरांना कवि कुसुमाग्रजांनी प्रेरणा दिल्याने या नाटकाचा आकृतीबंध सुचला, गवसला. बाबांना या कार्यात प्रच्छन्न विरोधक निर्माण झाले. हा विरोध तथाकथित लब्धप्रतिष्ठांचा, तसाच तो आपल्या स्वहित संबंधांसाठी दुर्बलांचे शोषण करणार्‍या धनिकांचा आणि सत्ताधार्‍यांचाही झाला. या त्यांच्या प्रचंड कार्यातील अनेक घटना, प्रसंग आणि व्यक्तिरेखांनी नाटक लिहिण्यात, बनविण्यात, गुंफण्यात हातभार लावला. कुष्ठरोगी हे आपल्या समाजजीवनाचे एक चित्र आहे. कुष्ठरोग्यांची सेवा हा एक सनातन प्रश्न आहे. हा रोग संपूर्णपणे बरा होऊ शकतो, यावर आजही कोणाचाच विश्वास बसत नाही.

बाबांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी यांच्या दुःखात काही एक साधर्म्य पाहिले आणि ते त्यांनी त्यांचे जीवित कार्य म्हणून स्वीकारले. एवढेच नाही तर त्यांच्या आख्या कुटुंब सदस्यांनी व पुढील पिढ्यांनीही स्वीकारले. आता बहुधा तिसरी पिढी त्याच दुःखितांच्या उद्धाराला आणि पुनर्वसनाच्या कामात अगदी आनंदात प्रेमाने, हसर्‍या चेहर्‍याने कार्यरत आहे. पीडितांना त्यांनी जवळ घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून त्यांना स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त केले आहे. आजच्या वैफल्यग्रस्त,भ्रष्टाचारी,स्वार्थी आणि दीड वितीच्या पोटभरू  दुनियेत एक प्रचंड डोंगरासारखा महामानव कसा घडतो व घडवतो त्याचे भावलेले चित्र वसंतरावांनी या नाटकात रंगवले आहे.

पहिला प्रयोग चंद्रलेखा,मुंबईने १९८४ मध्ये गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर केला होता. दिग्दर्शक-अरविंद देशपांडे,नेपथ्य-मोहन वाघ, पार्श्वसंगीत- अनंत अमेंबल, संगीत- अनिल मोहिले. कलाकार- यशवंत दत्त,जगन्नाथ कांडळगावकर,उपेंद्र दाते,महेश चौधरी,निरंजन परळकर,भाऊ बिवलकर,वसंत विचारे,संजय भालेकर,सुरेश सावंत,रेखा,शमा देशपांडे.

अशी ही नाटके पुनः पुन्हा पाहावीत, वाचावीत, अशीच आहेत ती! म्हणून तर मी सुद्धा त्यांच्या कादंबर्‍यांवर प्रकाश न टाकता त्यांची ओळख एक चतुरस्त्र नाटककार म्हणून होती  हे सांगण्यासाठी त्यांच्या खास खास नाटकांवर लिहिले आहे. कृपया, आपण  त्यांची मूळ पुस्तके-ग्रंथ वाचावेत. यातून काही “वसंत बहार” हाती लागल्यास आपल्या सर्वांचा भविष्यकाळ आनंदाचा जावा, याचसाठी हा केला होता अट्टाहास.

ravigadgil12@gmail.com      
 

Web Title: Lokmat 'Vasantotsav': Playwriter and Novelist Vasant Kanetkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.