हवाई दलाचा ‘ऋषी’तुल्य योद्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:38 AM2018-08-10T02:38:06+5:302018-08-10T02:38:19+5:30

भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनतर पहिले लढाऊ विमान उड्डाण करणारे एअर चिफ मार्शल हृषिकेश मुळगावकर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्ववर्षानिमित्त.

Air Force 'Sage' warrior | हवाई दलाचा ‘ऋषी’तुल्य योद्धा!

हवाई दलाचा ‘ऋषी’तुल्य योद्धा!

Next

-विजय बाविस्कर
भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनतर पहिले लढाऊ विमान उड्डाण करणारे एअर चिफ मार्शल हृषिकेश मुळगावकर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्ववर्षानिमित्त... भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्रनीतीशी निगडित विविध घटना या भिन्न प्रांत, भिन्न वातावरण, तसेच वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या आहेत. पण या प्रत्येक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याचं, कणखर मनोवृत्तीचं दर्शन घडवत विजयश्री खेचून आणणारे लढवय्ये व्यक्तिमत्त्व म्हणजे एअर चिफ मार्शल हृषिकेश मुळगावकर.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या हवाई मानवंदनेचे नेतृत्व एअर चिफ मार्शल हृषिकेश मुळगावकर या मराठमोळ्या योध्याने केले. काश्मीरमधील झोजीला येथील तुंबळ लढाई, १९७१ च्या युद्धातील डकोटा विमानांच्या कारवाया, पॅराट्रूपिंग आदी त्यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच यशस्वी झाल्या. आपल्या कारकिर्दीत ६७ प्रकारच्या विमानांचे त्यांनी सारथ्य केले. दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे आॅपरेशन काश्मीर, भारतीय हवाई दलास आकार देण्याची प्रक्रिया, एचएएलने बांधलेल्या मिग २१च्या पहिल्या तुकडीचे सारथ्य, सुरक्षित उड्डाणासाठीची नियमावली अशा अनेकविध घडामोडींमध्ये भारतीय हवाईदल प्रमुख म्हणून त्यांनी अभूतपूर्व कामगिरी बजाविली.
सुखवस्तू कुटुंबात जन्म, ब्रिटनमधील उच्च शाळेत शिक्षण अशी पार्श्वभूमी असतानाही धाडसी स्वभाव आणि राष्ट्रप्रेमामुळे मुळगावकरांनी हवाई दलात जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी ब्रिटिश हवाई दलासाठी वैमानिक म्हणून प्रवेश करत जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण करून हॉकर हार्ट्स विमानांच्या पहिल्या स्क्वाड्रनवर ते नियुक्त झाले. रॉयल आर्मीत दाखल झाल्यानंतर बर्मा येथील टुंगू हवाई क्षेत्रात जपानी फौजांबरोबरच्या धुमश्चक्रीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. हरिकेन व स्पिटफायर या लढाऊ विमानांच्या सारथ्यात ते वाकबगार होते. तब्बल २८० तास उड्डाण करून शत्रूला त्यांनी जेरीस आणले. १९४५ मध्ये कॉक्स बझार मोहिमेत त्यांचे स्पिटफायर विमान उड्डाणावेळी अकस्मात आग लागून अपघातग्रस्त झाल्याने उथळ पाण्यात कोसळले. भरतीनुसार पाण्याची पातळी वाढू लागली, तसा मुळगावकरांचा जगण्याचा संघर्ष कडवा होत गेला. प्राण कंठाशी आला. ब्रिटिश कमांडोंना विमानांचे अवशेष दिसल्यामुळे ते बचावले. सहा महिने रुग्णालयात काढल्यानंतर स्वस्थ न बसता ते पुन्हा सेवारत झाले. १९४८ ला ‘आॅपरेशन काश्मीर’ मोहिमेतील कार्याची दखल घेऊन त्यांना ‘महावीरचक्र’ या पदकाने गौरविण्यात आले. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन ते हवाईदल प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ‘हवाईदल दिन’ ८ आॅक्टोबरला साजरा करण्यामध्येही मुळगावकर यांचा सिंहाचा वाटा होता़
‘लोकमत’ परिवाराशी त्यांचे अनोखे ऋणानुबंध होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आपला ९३वा वाढदिवस ‘लोकमत’समवेत साजरा करताना शुभेच्छासंदेशात ते म्हणाले होते, ‘स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी फक्त राष्ट्रध्वज हातात घेऊन मिरविण्यापेक्षा मनामध्ये त्याविषयी आदर ठेवून देशासाठी प्राण अर्पण केलेल्या योद्ध्यांची आठवण करूया. १९४७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्यदिनी विमानाने आकाशात भरारी घेऊन केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत आकाशातून तिरंग्याला अभिवादन करत मी देशाविषयी प्रेम व्यक्त केले होते. तुम्ही जमिनीवर करा. त्यातूनच देशाची प्रगती आणि युवकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास प्रेरणा मिळेल.’ शिस्त, संघटनकौशल्य, तंत्रकुशलतेला महत्त्व देणारे, शत्रूशी लढताना नेतृत्व, चिकाटी, कणखरपणा दर्शवत उत्कृष्ट डावपेचात वाकबगार असणारे, शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्राच्या सुरक्षिततेचाच विचार करणारे एअर चिफ मार्शल हृषिकेश मुळगावकर यांच्या कार्यस्मृती विसरणे या देशाला कदापिही शक्य नाही.

Web Title: Air Force 'Sage' warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.