धुळे जिल्ह्यासाठी ४० हजार क्विंटल बियाणे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:55 AM2019-05-13T11:55:34+5:302019-05-13T11:56:24+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त बियाणे उपलब्ध होणार
आनलाईन लोकमत
धुळे : कृषी विभागाच्या नियोजनानुसार सन २०१९-२० च्या जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर खरिपाची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यासाठी ४० हजार ३२२ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यात महाबीजकडून ४ हजार ३१ क्विंटल तर खाजगी कंपनीकडून ३६ हजार २९१ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात कपाशीबरोबरच ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, भुईमुग, सोयाबीन, तीळ, भात आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.
खरीपाची लागवड लक्षात घेता कृषी विभागातर्फे बियाण्यांचे नियोजन केले आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्याला ३४ हजार ३९५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. त्यात धुळे तालुक्याला ७ हजार ३७३. ७१ क्विंटल, साक्री तालुक्याला १५ हजार ८४९.५८ क्विंटल, शिरपूर तालुक्याला ५ हजार ७२२ क्विंटल, व शिंदखेडा तालुक्याला ५ हजार ४४८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते.
गेल्यावर्षाप्रमाणेच यावर्षी लागवडीचे क्षेत्र तेवढेच असले तरी बियाण्यांची मागणी वाढलेली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेल्यावर्षाच्या तुलनेपेक्षा यावर्षी ५ हजार ९२७ क्विंटल बियाण्यांची जास्त मागणी नोंदणविण्यात आल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
बियाण्यांची तपासणी करावी
कृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र अनेकदा बियाण्यांमध्येही शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. काहीठिकाणी बोगस बियाण्यांचीही विक्री होत असते. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत बियाण्यांची तपासणी करण्यात यावी. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी.