रूळ ओलांडताना दुचाकी अडकली, तेवढ्यात धडाडत आली रेल्वे, दुचाकी सोडून तरुणाने काढला पळ, रेल्वेखाली दुचाकीचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:36 PM2019-05-06T23:36:17+5:302019-05-06T23:36:54+5:30
फाटक नसलेल्या ठिकाणावरून धूमस्टाईल रेल्वेरूळ ओलांडताना दुचाकी रूळात अडकली व तेवढ्यात समोरून धडाडत रेल्वे आली. गतीने येणारी रेल्वे पाहून तरुणाने दुचाकी तशीच सोडून पळ काढल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. संग्रामनगर परिसरातील रेल्वेरूळावर सोमवारी (दि. ६) सकाळी हा प्रकार घडला. रेल्वेच्या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन तुकडे तुकडे झाले.
औरंगाबाद : फाटक नसलेल्या ठिकाणावरून धूमस्टाईल रेल्वेरूळ ओलांडताना दुचाकी रूळात अडकली व तेवढ्यात समोरून धडाडत रेल्वे आली. गतीने येणारी रेल्वे पाहून तरुणाने दुचाकी तशीच सोडून पळ काढल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. संग्रामनगर परिसरातील रेल्वेरूळावर सोमवारी (दि. ६) सकाळी हा प्रकार घडला. रेल्वेच्या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन तुकडे तुकडे झाले. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली.
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, संग्रामनगर रेल्वे फाटक बंद केल्यानंतरही परिसरातील रहिवासी नागरिक धोकादायक पद्धतीने रेल्वेरूळ ओलांडतात. काही महाशय तर चक्क रेल्वेरूळावरून दुचाकी नेतात. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी एक तरुण बायपासकडून संग्रामनगरकडे दुचाकीने येऊ लागला. उड्डाण पुलावरून जाण्याऐवजी खालच्या बाजूने तो रेल्वेरूळ ओलांडू लागला. तेव्हा त्याची मोपेड रूळामध्ये अडकली. त्याचवेळी मराठवाडा एक्स्प्रेस हॉर्न वाजवीत निघाली होती. प्रयत्न करूनही त्या तरुणाला मोपेड रूळावरून बाजूला घेता येईना. रेल्वे जवळ आल्याचे पाहून त्याने प्रसंगावधान राखत दुचाकी रूळावर सोडून पळ काढला. यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, भरधाव रेल्वेच्या धडकेने त्याची मोपेड सुमारे ५० ते ६० मीटर फरपटत नेली. या घटनेत त्याच्या मोपेडचे स्पेअर पार्ट वेगवेगळे होऊन रूळावर विखुरले. रेल्वेचालकाने इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबविली. सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांना ही माहिती कळविली. जमादार आवारे, कुंदन शेळके आणि लोहमार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून रूळावरील दुचाकीचे विखुरलेले स्पेअर पार्ट जप्त केले. मोपेडस्वार तरुणाचा पोलीस शोध घेत आहे.
मोठा अनर्थ टळला
रेल्वेचे चाक आणि रूळाच्या घर्षणातून ठिणग्या पडत असतात. दुचाकीमधील पेट्रोल जर ठिणग्यांच्या संपर्कात आले असते, तर रेल्वेने पेट घेतला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने दुचाकीची इंधन टाकी फुटून पेट्रोल सांडले नाही.