खरिपाचा पेरा पावणेपाच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:18 PM2018-05-23T23:18:35+5:302018-05-23T23:19:13+5:30

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.

Kharipacha sowing is about 100 lakh hectares | खरिपाचा पेरा पावणेपाच लाख हेक्टरवर

खरिपाचा पेरा पावणेपाच लाख हेक्टरवर

Next
ठळक मुद्देसोयाबीन घटणार : कृषी विभागाच्या मते कापसाचा पेरा सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.
जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी शेतकºयांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्टयातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकºयांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकºयावर अरिष्ट ओढावले होते.
शेतकºयांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकºयांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो. परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकºयांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही.
जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. नियोजनही तयार केले आहे. यात जिल्ह्यात एकूण चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकांची लागवड केली जाणार आहे.
मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. यावेळी पुन्हा कृषी विभागाने पेरणी क्षेत्र वाढविले आहे. शेती व्यवसाय सध्या शेतकºयांना परवडणारा राहिलेला नाही. मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे.
नागरणी, वखरणी, शेतात शेणखत टाकणे, कुंपण तयार करणे, अनावश्यक झुडुपे हटविणे आदी कामांना आता वेग आला आहे. उन्हाची पर्वा न करता शेतकरी सकाळी ६ वाजतापासून शेतात व्यस्त असताना दिसून येत आहे.
कापूस दोन लाख हेक्टरवर
मागील वर्षी कापूस पिकांवर बोंडअळीने आक्रमण केले होते. या अळीने पूर्ण कापूस पीक उद्ध्वस्त केले. उत्पादनात कमालीची घट आली. जे उत्पादन झाले, त्यातही बोंडअळीचा प्रभाव होताच. कापसाची प्रतवारी खराब होऊन कापसाला किंमत मिळाली नाही. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा घटणार, असे वाटत होते. मात्र कृषी विभागाच्या नियोजनानुसार कापसाचा पेराच यंदा सर्वाधिक असणार आहे. यंदा एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
सोयाबीनला पसंती नाही
जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र एक लाख हेक्टर आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनने शेतकºयांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा चांगलाच घटला. शेतकºयांनी सोयाबीनला पसंती दर्शविली नाही. केवळ ४९ हजार हेक्टरवरच सोयाबीनची लागवड करण्यात आली. त्यामुळे कृषी विभागाने यावेळी ५३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा नियोजित केला आहे. मात्र मागील वर्षी बोंडबळीने कापसावर केलेले जोरदार आक्रमण लक्षात घेता कृषी विभागाचे हे नियोजन शेतकरी खोटे ठरवून सोयाबीनची लागवड अधिक प्रमाणात करतील की काय, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
खताची टंचाई नाही
यंदाच्या खरीप हंगामात खताची टंचाई जाणवणार नाही, असे संकेत दिसून येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण २७ हजार २५९ मेट्रीक टन खत प्राप्त झाला आहे. यातील एक हजार १३६ मेट्रीक टन खत विक्रीसाठी असणार आहे आणि एकूण २६ हजार १२३ मेट्रीक टन खताची उपलब्धता कृषी विभागाकडे आहे. त्यामुळे शेतकºयांना केव्हाही खते मिळू शकणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एस. किरवे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
धानाचा पेराही वाढणार
सोयाबीनबाबत शेतकरी उदासीन आहेत. कापूस बोंडअळी व चोर बिटी बियाण्यांमुळे अडचणीत आहे. त्यामुळे धानाच्या पेरा यंदा वाढणार, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ८० हजार १०० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड कृषी विभागाला अपेक्षित आहे. मागील वर्षी धानावर मावा तुडतुडा रोगाने आक्रमण केले होते. त्यामुळे धानाची उतारी निम्म्यावर आली होती. यात शेतकºयांना जबर फटका बसला. असे असले तरी सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली या धानपट्टयातील तालुक्यात धानाचीच लागवड केली जाते. कृषी विभागानुसार यंदा ४६ हजार ६०० हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे.

यावेळी खरिपाचा पेरा चांगलाच असणार आहे. चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरीपाची लागवड होईल, असा अंदाज आहे. बियाणे व खतांची टंचाई निर्माण होणार नाही. कृषी विभागाची भरारी पथकेही तयार आहेत.
- अण्णासाहेब हसनाबादे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Kharipacha sowing is about 100 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.