लाज-या वैभव गायकवाडची युपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:27 AM2018-05-08T11:27:35+5:302018-05-08T11:27:35+5:30

शिक्षण घेऊन स्वत: व्यवसाय करण्याचं स्वप्न. त्यादृष्टीने शिक्षणही घेतलं. इंजिनिअरिंगची डीग्री मिळाली. जॉबही मिळाला. तोपर्यंत यूपीएससीची काहीच माहिती नव्हती. त्यानंतर माहिती घेतली अन् यूपीएससीचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी दिल्ली गाठली. सलग चार वर्षे आत्मविश्वासाने अभ्यास केला. घरच्यांनीही खंबीर पाठिंबा दिला. या बळावर यूपीएससीमध्ये देशभरात ५५१ रँकवर नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील वैभव रघुनाथ गायकवाड याने यश मिळविले. त्याच्या यशोगाथेवर टाकलेला हा प्रवास...

Utsing Bharari in Laj-or Vaibhav Gaikwad's UPSC exam | लाज-या वैभव गायकवाडची युपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

लाज-या वैभव गायकवाडची युपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

googlenewsNext
ठळक मुद्देयुपीएससीमध्ये यश मिळविलेल्या वैभव गायकवाडची यशोगाथा

नवनाथ खराडे
अहमदनगर :शिक्षण घेऊन स्वत: व्यवसाय करण्याचं स्वप्न. त्यादृष्टीने शिक्षणही घेतलं. इंजिनिअरिंगची डीग्री मिळाली. जॉबही मिळाला. तोपर्यंत यूपीएससीची काहीच माहिती नव्हती. त्यानंतर माहिती घेतली अन् यूपीएससीचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी दिल्ली गाठली. सलग चार वर्षे आत्मविश्वासाने अभ्यास केला. घरच्यांनीही खंबीर पाठिंबा दिला. या बळावर यूपीएससीमध्ये देशभरात ५५१ रँकवर नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील वैभव रघुनाथ गायकवाड याने यश मिळविले. त्याच्या यशोगाथेवर टाकलेला हा प्रवास...

वैभवचा जन्म नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सर्वसामान्य कुटुंबातील. वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. घरात तीन भावंडं. त्यामधील सगळ््यात लहान असणा-या वैभवचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीपर्यंत शिक्षण गावातीलच श्रीराम विद्यालयात पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी नगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात सायन्स शाखेला प्रवेश घेतला. १२ वीनंतर शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथून मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुण्यात डीग्री मिळविली. डीग्री पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष नोकरी केली. तोपर्यंत यूपीएससी म्हणजे काय याची साधी ओळखही वैभवला नव्हती. वडील रघुनाथ यांच्या मित्राने यूपीएससीबाबत एकदा सहज बोलताना कल्पना दिली. ही कल्पना वडिलांनी वैभवला बोलून दाखविली. त्या दरम्यान त्याच्या हाती एक पुस्तक पडलं. मित्रानांही त्याच्यामधील गुणवत्ता ओळखून त्याला प्रोत्साहित केलं. स्वत:चा आत्मविश्वास, चिकाटी, कुटुंबीयांचा खंबीर पाठिंबा, मित्रांच्या साथीनं वैभवने यूपीएसच्या स्वप्नासाठी नोकरीला राम-राम ठोकला. यूपीएससीबाबत प्राथमिक माहिती घ्यायला त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा वैभवनं दिल्या. मात्र त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेड लागलं होतं. वैभवनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी २०१४ साली दिल्ली गाठली. येथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला. पहिले वर्ष यूपीएससी काय हे कळण्यातच गेलं. हळूहळू अभ्यासाची गती वाढली. दिल्लीतील एका स्टडी सर्कलमध्ये वैभवची निवड झाली. तिथे त्याच्या स्वप्नाला बळ मिळालं.
पहिल्या प्रयत्नात त्याला पूर्वपरीक्षेची पायरीही चढता आली नाही. दुस-या प्रयत्नात तो मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचला. मात्र मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास झाला नाही. त्यामुळे थोडी निराशाही आली. मात्र तो खचला नाही. या प्रवासात अपयश आले तरी हरकत नाही, असे म्हणत घरचे पाठीशी होते. त्यानंतर स्वप्नसुद्धा अधिकारी झाल्याचे पडायचे. त्यानंतर १०० टक्के फोकस अभ्यासावर केंद्रित केले. घरच्यांनी या प्रवासात कधीच वैभववर दबाव टाकला नाही. तिस-या प्रयत्नात त्याने मुलाखतही दिली. मात्र त्याची निवड झाली नाही. घरच्यांनी सातत्याने आत्मविश्वास दिला. सकाळी दहा वाजल्यापासून अभ्यासाला सुरुवात व्हायची. दुपारी थोडा आराम करून अभ्यास सुरू राहायचा. मात्र सलगपणे अभ्यास करण्यापेक्षा दोन दोन तास अभ्यास करण्यास वैभवने प्राधान्य दिले. दिवसभरात ८ ते १० तास नित्यनेमाने अभ्यास करत असे. चौथ्या प्रयत्नात मात्र त्याने यश मिळवत देशात ५५१ क्रमांक मिळविला. त्याने पाहिलेलं स्वप्न चार वर्षांनंतर पूर्ण झालं. या सर्व प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन लाभले. लहान असताना आजोबा दिवंगत सोन्याबापू गायकवाड यांनी अभ्यासाची आवड लावली. अभ्यास करण्यासाठी सातत्याने बक्षिसे ठेवली. आजी रुक्मिणी यांनीही नातवांना कायमच मार्गदर्शन केले. याशिवाय आजोबांचे संस्कार वडील रघुनाथ यांच्यावर होते. स्वत: किराणा दुकान सांभाळून तीनही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. आई शोभा यांनी मोलाची साथ दिली. या शिवाय मोठे बंधू अमृत आयटी इंजिनिअर असून, त्यांनी सातत्याने वैभवला पाठिंबा देत प्रे्ररणा दिली. सगळा खर्च त्यांनी उचलला. बहीण डॉ. सुवर्णा विक्रम धारकर हिने सातत्याने पाठिंबा दिला. या शिवाय चुलती सुनीता अशोक गायकवाड यांनीही या प्रवासात साथ दिली. प्राचार्य ज्ञानदेव खराडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

सामाजिक कार्याचीही जपली आवड
वैभव हुशार असला तरी लाजाळू. डिग्री होईपर्यत स्टेजवर आलाच नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा सातत्याने त्याच्या मनात होती. मित्राच्या मदतीने वैभवने गावात सामाजिक काम सुरु केले. गणेशोत्सवाच्या काळात वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. या माध्यमातून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढला.

कोणतेही काम करताना कायम सकारात्मक राहायला हवे. तुमचे शिक्षण कोणत्याही माध्यमात झाले तरी काही फरक पडत नाही. मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. आम्हालाहाी इंग्रजी माध्यमातून शिकणा-या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागली. त्यामुळे माध्यमापेक्षा चांगले शिक्षण महत्वाचे आहे. पालकांमध्येही याबाबत जागरुकता असायला हवी. एमपीएससी किंवा युपीएससी हेच करीअर नाही. मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची माहिती लवकर होते त्यामानाने ग्रामीण भागात उशीरा माहिती होते. सद्यस्थितीत मराठी टक्का नक्की वाढत आहे. तुमच्या स्वत:मध्ये असणारा आत्मविश्वास तुम्हाला हमखाश यश मिळवून देतो. यश मिळाल्याने घरच्यांना सर्वात जास्त आनंद झाला. मला अपेक्षित असलेलं यश न मिळाल्याने मी सुरुवातीला नाराज होतो. मात्र सर्वांच्या आनंदाने आणखी आनंदित झालो. घरच्यांचे संस्कार, कष्ट, लोकांचे आशीर्वाद या सगळ््यामुळे यश मिळाले आहे. गावातील पहिलाच अधिकारी असल्याने सर्वांनी कौतुक, सत्कार केले. या यशामुळे नक्कीच जबाबदारी वाढली आहे. या माध्यमातून सामान्य लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. - वैभव गायकवाड

Web Title: Utsing Bharari in Laj-or Vaibhav Gaikwad's UPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.