यवतमाळ ‘एसटी’ आगार वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 20:58 IST2019-03-20T20:58:04+5:302019-03-20T20:58:54+5:30
कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे.

यवतमाळ ‘एसटी’ आगार वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच प्रमुख अधिकारी आजारी रजेवर गेले असल्याने हा आगार वाऱ्यावर आहे.
प्रवाशांची सर्वाधिक गर्दी राहात असलेल्या अमरावती, नागपूर मार्गावर शिवशाही बसफेºया वाढविल्या. तिकीट दीडपट असल्याने बहुतांश प्रवासी या बसने प्रवास टाळतात. कमी तिकिटाच्या बसेस अर्धा ते एक तासाने फलाटावर लागतात. त्यातील बहुतांश बाहेरून येत असल्याने फुल्ल येतात. अशावेळी यवतमाळ बसस्थानकावरून चढणाºया प्रवाशांना स्टँडिंग प्रवास करावा लागतो. अमरावती, नागपूर मार्गावर लालपरी कमी झाल्यानेही प्रवासी एसटीपासून दूर चालला आहे.
आगाराचे उत्पन्न घटण्यास हे एक मोठे कारण सांगितले जाते. तरीही त्यावर उपाययोजना होत नाही. आता तर या आगाराचे आणि बसस्थानकाचे अधिकारीच रजेवर गेलेले आहेत. आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुख रजेवर आहेत. वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक प्रभारी आहेत. त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने जबाबदारी पार पाडली जात नाही. आगारात नादुरुस्त बसेस लवकर दुरुस्त केल्या जात नाही. कामगारांवर कुणाचाच वचक नसल्याने सोयीने काम सुरू आहे. आधीच बसचा तुटवडा आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील फेऱ्यांना बसत आहे. ऐन वेळेवर बस रद्द करून किंवा उशिरा पाठवून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.
कर्मचारी अडचणीत
बसेस वेळेवर उपलब्ध होत नाही. ऐनवेळी फेरी रद्द केली जाते. अशावेळी एसटी चालक, वाहकांपुढे ड्युटीचा प्रश्न निर्माण होतो. मार्गावर नेण्यास अयोग्य असलेल्या बसेसही पुरविल्या जातात. प्रवाशांना त्रास होईल, अशा बसेस चालकांनी मार्गावर नेऊ नये, असे नियम करून ठेवले आहे. प्रत्यक्षात आगारातूनच सुस्थितीतील बसेस उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. यवतमाळ आगारात कामगारांचे रजा अर्ज स्वीकारण्यासही टोलवाटोलवी केली जाते. जबाबदारी कुणीही स्वीकारण्यास तयार नाही. विभाग नियंत्रकांचेच नियंत्रण नसल्याची ओरड कामगारांमधून होत आहे.