पाण्यासाठी दिग्रस पालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:58 IST2019-03-30T21:57:08+5:302019-03-30T21:58:38+5:30
नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अखेर घंटीबाबा चौकातील संतप्त महिलांनी शनिवारी पालिकेवर धडक देऊन अभियंत्याला घेराव घातला.

पाण्यासाठी दिग्रस पालिकेवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अखेर घंटीबाबा चौकातील संतप्त महिलांनी शनिवारी पालिकेवर धडक देऊन अभियंत्याला घेराव घातला.
शहरात मुबलक पाणी असूनही आठवड्यातून एकदाच नळ सोडले जात आहे. तेही केवळ अर्धा तास पाणी दिले जाते. पाणीपुरवठ्याचा दाबही अत्यंत कमी असून या परिस्थितीला कंटाळून महिलांनी दुपारी पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घातला. कृत्रिम टंचाई मिटवावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले. शहरात पाण्याची बिकट समस्या असताना नगरसेवक केवळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच व्यस्त असल्याबाबत महिलांनी संताप व्यक्त केला.