नेरमधील वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:24 IST2019-06-09T21:23:18+5:302019-06-09T21:24:39+5:30
तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.

नेरमधील वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.
तालुक्यातील जवळपास ३० गावांना वादळाचा तडाखा बसला. अनेक लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याने त्यांना आभाळाच्या छताखाली राहावे लागत आहे. टीनपत्रे खराब झाल्याने नवीन घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याशिवाय इतर वस्तूंची नासधूस झाली.
स्वयंरोजगार म्हणून सुरू केलेल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायालाही फटका बसला. तालुक्यात दोन जणांचे कुक्कुटपालन शेड उडून गेले. यात शेकडो कोंबड्या मृत झाल्या. फळबागांना मोठी हानी पोहोचली. फळे गळून पडली, तर काही ठिकाणी झाडे जमिनदोस्त झाली. रस्त्यावरील झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.
मागील पाच दिवसात तालुक्यातील घारेफळ, बाणगाव, चिचगाव, शेंद्री, सातेफळ, सारंगपूर, मोझर, उदापूर, मांगलादेवी, माणिकवाडा, कापसी, सातेफळ, उमरठा, खरडगाव, सावरगाव, ब्राह्मणवाडा (पूर्व), ब्राह्मणवाडा (पश्चिम) आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. काही भागात पाऊस झाला. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलवार व संजय भोयर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विद्युत कंपनीचा गलथान कारभार
उन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने सुरू केली नाही. शिवाय तालुक्यात विविध कामांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचेही पितळ उघडे पडले. निकृष्ट वीज खांब जमिनदोस्त झाले. या सर्व प्रकारात ग्रामीण भागात सर्वत्र अंधार आहे. शिवाय शहरालाही ही समस्या भेडसावत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.