उमरखेड शहरात अज्ञात व्यक्तीने एकाच रात्री पाच दुचाकी पेटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:38 IST2019-12-07T22:37:58+5:302019-12-07T22:38:26+5:30
मोठ्या शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी दुचाकी पेटविण्याचे प्रकार घडले. त्याचे लोण आता उमरखेडपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ज्ञानेश्वर माणिकराव कदम, निखिल अवधूत गुल्हाने, रणजीत पंजाबराव नाईक, समाधान तान्हाजी नरवाडे व रितेश वैद्य यांच्या दुचाकी पेट्रोल टाकून पेटविल्या. यामुळे शहरात खळबळ उडाली.

उमरखेड शहरात अज्ञात व्यक्तीने एकाच रात्री पाच दुचाकी पेटविल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील पाटीलनगर परिसरातील सत्यशोधक शिक्षक कॉलनीत शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सहा दुचाकी पेटविण्यात आल्या. यात अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अज्ञात आरोपींनी पेट्रोल टाकून दुचाकी पेटविल्याने वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मोठ्या शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी दुचाकी पेटविण्याचे प्रकार घडले. त्याचे लोण आता उमरखेडपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ज्ञानेश्वर माणिकराव कदम, निखिल अवधूत गुल्हाने, रणजीत पंजाबराव नाईक, समाधान तान्हाजी नरवाडे व रितेश वैद्य यांच्या दुचाकी पेट्रोल टाकून पेटविल्या. यामुळे शहरात खळबळ उडाली. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटना लक्षात येताच काहींनी दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुचाकीचे नुकसान झाले. यात अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निखिल गुल्हाने यांनी पोलिसात तक्रार दिली.
यापूर्वी गुरुवारी रात्री खडकपुरा परिसरातील अतुल अनंता अन्नदाते यांची दुचाकीही अज्ञातांनी पेटविली होती. त्यांनीही शनिवारी पोलिसात तक्रार दिली. दुचाकी पेटविण्याच्या घटना घडल्याने वाहनधारकांत दहशत आहे. ठाणेदार संजय खंदाडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह
पुणे-मुंबईचे वाहन पेटविण्याचे लोण उमरखेडमध्ये आल्याने वाहनधारक धास्तावले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सातत्याने वाहन पेटविण्याच्या घटना घडत आहे. यामुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस रात्री नेमकी कोठे पेट्रोलिंग करतात, याबाबत चर्चा आहे.