एकाच गावात दोन दिवस पोळा... तोही तंटामुक्त !
By Admin | Updated: September 12, 2015 02:12 IST2015-09-12T02:12:39+5:302015-09-12T02:12:39+5:30
दरवर्षी पोळा म्हणताच गावागावांत भांडणतंटे, हाणामाऱ्या हे प्रकार नित्याचेच. पण एकाच गावात सलग दोन दिवस पोळा भरूनही अजिबात वादविवाद न उद्भवण्याचे आगळे उदाहरण ...

एकाच गावात दोन दिवस पोळा... तोही तंटामुक्त !
महाळुंगी गावाचे वेगळेपण : सुरक्षा, बंदोबस्ताचीही गरज पडत नाही, गावकऱ्यांचा सलोखा
लोकमत विशेष
हरिओम बघेल आर्णी
दरवर्षी पोळा म्हणताच गावागावांत भांडणतंटे, हाणामाऱ्या हे प्रकार नित्याचेच. पण एकाच गावात सलग दोन दिवस पोळा भरूनही अजिबात वादविवाद न उद्भवण्याचे आगळे उदाहरण यवतमाळ जिल्ह्यात आहे. अशा तंटामुक्त पोळ्याची किमया आर्णी तालुक्यातील महाळुंगी गावाने साधली आहे. गावाच्या ऐकोप्याची ही परंपरा बऱ्याच वर्षांपासून अखंड आहे, हे विशेष !
माळपठारात वसलेले हे गाव. आजूबाजूला उंच माळ असल्यामुळेच महाळुंगी असे या गावाचे नामाभिधान. चार हजार लोकसंख्या असलेले हे तालुक्यातील मोठे गाव. शेती आणि शेतमजुरी यावरच गावकऱ्यांची गुजरान. शेतीही कोरडवाहू. पण प्रत्येक शेतकरी श्रमाचीच पूजा करणारा. बैलावर त्याची प्रगाढ श्रद्धा. त्यामुळेच पोळा हा या गावातील सर्वात मोठा सोहळा. अलिकडे शेतीमध्ये बैलांचा वापर कमी होत चालला असला तरी महाळुंगीच्या कास्तकारांनी बैलांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अजूनही जपले आहे. म्हणूनच या गावात अनेक वर्षापासून सलग दोन दिवस पोळा भरविला जातो. पोळ्याच्या दिवशी तर बैलांची पूजा केली जातेच. पण दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्यांना सजवून पोळा भरविला जातो. बैल हे आमचे दैवत आहे. त्यामुळेच सतत दोन दिवस पोळा भरविण्याची परंपरा आम्ही जपतो, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
पोळा भरविताना पोलीस बंदोबस्त घेण्याचे या गावाला आजवरच्या इतिहासात कधीच गरज भासली नाही. पोळ्यादरम्यान कधीही भांडणतंटा उद्भवला नाही. संपूर्ण गावकरी एकत्र येऊन हा सण श्रद्धेने साजरा करतात. श्रमाचा संस्कार जसा या गावकऱ्यांवर झाला तसाच सामाजिक सलोख्याचाही झाला आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात शांततामय पोळ्याची परंपरा टिकू शकली.