कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2025 12:31 IST2025-12-17T12:29:35+5:302025-12-17T12:31:45+5:30
काही दिवसांपूर्वी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता.

कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
कल्याण - महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यात युती आणि आघाडी यांच्या चर्चांना जोर आला आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही पक्षातून नेत्यांची एक्झिट होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी माजी नगरसेविका कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
कस्तुरी देसाई या मनसेच्या महिला शहर अध्यक्षा होत्या. मागील निवडणुकीत फ्लॉवर व्हॅली येथून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. केडीएमसीतील अनेक माजी नगरसेवक सध्या भाजपा आणि शिंदेसेनेत प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. त्यात मनसेचे माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. कौस्तुभ देसाई आणि कस्तुरी देसाई हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत होते. कौस्तुक देसाई सुरुवातीला विद्यार्थी सेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेचे शहर अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई या दोघांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की, समाजकारण आणि राजकारणातील माझा प्रवास माझे गुरु, सहकारी कार्यकर्ते, नागरीक आणि मार्गदर्शक यांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करून हृदयाच्या जड अंत:करणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझा हा निर्णय पूर्णत: वैयक्तिक असून मला पक्षाविषयी कोणताही गैरसमज अथवा नाराजी कारणीभूत नाही. मनसेचे प्रतिनिधित्व करताना पक्षाचे अध्यक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे असं म्हणत दोघांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. हे दोघेही भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनीही समाजकारण आणि राजकारणातील प्रवास हा त्यांचे गुरू, सहकारी कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक यांच्या मताचा, भावनांचा आदर यावर अवलंबून असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रकाश भोईर दाम्पत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.