२० तालुक्यात नऊ महिन्यात एकही ट्रॅप नाही

By Admin | Updated: September 30, 2014 23:40 IST2014-09-30T23:40:39+5:302014-09-30T23:40:39+5:30

राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत

There are no traps in nine months for nine months in 20 talukas | २० तालुक्यात नऊ महिन्यात एकही ट्रॅप नाही

२० तालुक्यात नऊ महिन्यात एकही ट्रॅप नाही

अ‍ॅन्टी करप्शन : महासंचालकांचे अमरावती एसपींना पत्र
यवतमाळ : राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत या तालुक्यांमध्ये एकही ‘ट्रॅप’ (सापळा) न झाल्याने पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी २५ सप्टेंबर रोजी एसीबीचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक आर.एस. तडवी यांना पत्र पाठविले. त्यात २० तालुक्यांमध्ये जानेवारी २०१४ पासून एकही ट्रॅप दाखल झाला नसल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. उपरोक्त तालुक्यांमध्ये अधिकाधिक सापळे लावून लाचखोरांना पकडण्याच्या सूचना द्याव्या, असे दीक्षित यांनी आदेशात नमूद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक (१०६४) जाहीर केला आहे. प्रत्येक तालुक्यातील आठवडीबाजारांच्या दिवशी हा क्रमांक तेथे ठळकपणे कुणालाही दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करावा, हा क्रमांक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्या माध्यमातून सापळे रचण्याकरिता फायदा होईल, असेही दीक्षित यांनी नमूद केले. उपरोक्त तालुक्यांमध्ये सापळे यशस्वी करून त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१४ पर्यंत सादर करण्याचे निर्देश एसीबीच्या एसपींना देण्यात आले आहे. उपरोक्त २० तालुक्यात चालू वर्षात एकही ट्रॅप न झाल्याने तेथे लाचेशिवाय शासकीय कामकाज सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यात एसीबीची कामगिरी उंचावली आहे. वार्षिक टार्गेट अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यातही कनिष्ठ कर्मचाऱ्यासह पहिल्यांदाच वरिष्ठही जाळ्यात अडकू लागले आहेत. एसीबीच्या या ट्रॅपची शासकीय यंत्रणेत दहशत पहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये भारतीय वनसेवेचे अधिकारी (आयएफएस) तर यवतमाळात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. नागपूर विभागातील ट्रॅप शंभरावर तर यवतमाळातील दोन डझनावर गेले आहे. असे असताना उपरोक्त २० तालुके या ट्रॅपमधून सुटलेच कसे, हाच मुख्य प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ट्रॅप यशस्वी झाल्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या पत्रावरून दिसून येते. कारण या पत्रात अकोला जिल्ह्याचा कोणताही उल्लेख नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: There are no traps in nine months for nine months in 20 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.