शिवसेनेचे उमेदवार निष्ठावंत की नवखे ?
By Admin | Updated: September 7, 2014 00:09 IST2014-09-07T00:09:53+5:302014-09-07T00:09:53+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निष्ठावंत शिवसैनिकांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची की उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उडी मारणाऱ्यांना द्यायची, याचा पेच सध्या ‘मातोश्री’वर उद्भवला आहे.

शिवसेनेचे उमेदवार निष्ठावंत की नवखे ?
विधानसभा निवडणूक : वणी, पुसद मतदारसंघात पेच
राजेश निस्ताने - यवतमाळ
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निष्ठावंत शिवसैनिकांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची की उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उडी मारणाऱ्यांना द्यायची, याचा पेच सध्या ‘मातोश्री’वर उद्भवला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे. तर पुसद, दिग्रस आणि वणी हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. दिग्रसमध्ये संजय राठोड हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. वणी आणि पुसदमध्ये मात्र शिवसेनेच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारीच्या या स्पर्धेत आधीच निष्ठावंत शिवसैनिक असताना ऐनवेळी बाहेरुन येणाऱ्यांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारीची ही स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. त्यातूनच ‘मातोश्री’वर नेमके कुणाला झुकते माप मिळणार, निष्ठावंतांना की उमेदवारीवर डोळा ठेऊन ऐनवेळी शिवसेनेत येऊ पाहणाऱ्यांना ? याकडे लक्ष लागले आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघासाठी आधीच पाच निष्ठावंत शिवसैनिकांची नावे ‘मातोश्री’वर पोहोचली आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक यांच्या नावाची भर पडली आहे. या दोघांनीही शिवसेनेत येण्याची तयारी दर्शवून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे. अशीच अवस्था वणी विधानसभा मतदारसंघात आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र ऐनवेळी शिवसेनेच्या मुंबईतील मुलाखतीला राष्ट्रवादीचे नेते संजय देरकर उपस्थित झाल्याने नांदेकरांच्या दावेदारीलाच सुरुंग लागला आहे. विशेष असे देरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीलाही हजेरी लावली होती.
पुसद आणि वणी या विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नवख्यांच्या ‘सशर्त’ आगमनाच्या तयारीमुळे तीव्र असंतोष आहे. ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांनी आमचा नेता बनायचे आणि आम्ही वर्षानुवर्षे सतरंज्याच उचलायच्या काय ? असा कळीचा मुद्दा या शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. पुसदच्या उमेदवारीवरून दोन गट पडले आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी आपल्या पैकीच कुणालाही उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना त्यांचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे विधानसभेच्या उमेदवारीवर दावा करून शिवसेनेत येण्याची तयारी दर्शविलेले प्रकाश देवसरकर व निलय नाईक दोघेही तुल्यबळ असल्याने शिवसेना नेतृत्व दुहेरी पेचात पडले आहे. एक तर निष्ठावंतांना द्यायचे काय आणि दुसरे नवख्यांपैकी नेमका कोण प्लस राहील याचा निर्णय घेताना सेना नेत्यांची कसोटी लागणार आहे. वणी मतदारसंघातही नांदेकर प्लस ठरणार की देरकर यावर चिंतन केले जात आहे. नवख्यांना उमेदवारी देऊन नेता बनविल्यास सामान्य शिवसैनिकांची भूमिका काय राहील, ते दुखावले तर जाणार नाही ना, त्यांचा फटका तर सहन करावा लागणार नाही ना याची चाचपणी केली जात आहे. पुसद विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटल्यास निलय नाईक वेळप्रसंगी भाजपाचेही उमेदवार राहू शकतात, असे राजकीय गोटात बोलले जाते. मात्र हा मतदारसंघ भाजपाला सोडल्यास शिवसेनेला यवतमाळ अथवा आर्णी या पैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार आहे, एवढे निश्चित.