जिल्ह्यातील कोट्यवधींचे रेतीघाट बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:01 IST2018-11-18T22:00:44+5:302018-11-18T22:01:37+5:30
रेतीघाट लिलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याच्या संधीचा फायदा घेत तस्करांनी लाखो रूपये किमतीच्या रेतीची चोरी सुरू केली आहे. चोरी रोखण्यात खनिकर्म विभागाला पूर्णत: अपयश आले आहे. तहसीलची यंत्रणाही अपयशी ठरली आहे.

जिल्ह्यातील कोट्यवधींचे रेतीघाट बेवारस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रेतीघाट लिलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याच्या संधीचा फायदा घेत तस्करांनी लाखो रूपये किमतीच्या रेतीची चोरी सुरू केली आहे. चोरी रोखण्यात खनिकर्म विभागाला पूर्णत: अपयश आले आहे. तहसीलची यंत्रणाही अपयशी ठरली आहे.
यावर्षी जिल्ह्यात धुवांधार पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ७८ टक्के आहे. नद्या तुडूंब भरून वाहिल्या. यामुळे रेतीघाट खचाखच भरले आहेत. विशेष म्हणजे, रेतीघाटांवर सध्या कुणाचीही मालकी नाही. हे घाट पूर्णत: शासकीय नियंत्रणात आले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणा नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली आहे. तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरीला सुरूवात केली आहे. रात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे.
शिवारातून अंतर्गत रस्ते
पूर्वी ८ ते १२ हजार रूपयात रेतीचा एक ट्रक मिळत होता. आता हे दर १८ ते २० हजारांपर्यंत पोहचले आहे. विशेष म्हणजे, रेती पोहचविणारे ट्रक छुप्या पद्धतीने पाठविले जातात. त्याकरिता छुप्या रस्त्यांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी स्थितीने सारे शेतशिवार मोकळे झाले आहे. या संधीचा फायदा घेत वाहनचालक वाट्टेल तिथून मार्ग काढत आहेत. यामुळे शासकीय यंत्रणेला रेती पकडताच आली नाही.
सर्वच घाट सोईस्कर
११० रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करता येतो. मात्र त्याला प्रथम भूजल सर्वेक्षण आणि ग्रामपंचायतीची मान्यता मिळवावी लागते. यासोबत पर्यावरणाच्या दृष्टीने परवानगी गरजेची आहे. जिल्हा स्तरावर यातील काही रेतीघाटांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाने मुदत संपलेल्या घाटांची लिलाव प्रक्रिया राबविता येत नाही. यामुळे रेतीमाफियांनी धुमाकूळ घातला आहे.