पुसद, उमरखेड विभागाला गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:43 IST2018-02-15T00:42:11+5:302018-02-15T00:43:19+5:30
पुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद व उमरखेड विभागातील पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्याला गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यात एकट्या महागाव तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

पुसद, उमरखेड विभागाला गारपिटीचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद व उमरखेड विभागातील पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्याला गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यात एकट्या महागाव तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळी वातावरण असून कधी अवकाळी पाऊस, तर कधी वादळी पाऊस येत आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुसद, महागाव तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले. यात पुसद तालुक्यातील दोन जनावरे मृत्यूमुखी पडली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी गारपीटग्रस्त फुलवाडीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत अॅड. गजानन देशमुख, इस्ताकभाई, विजय राठोड, बळीराम चव्हाण, सरपंच आदी उपस्थित होते.
महागाव तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने १७ हजार हेक्टरवरील हरभरा, पाच हजार हेक्टरवरील गहू व पाचशे हेक्टरवरील संत्रा पिकाला गारपिटीचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर यांनी दिली. ज्या भागात मोठे नुकसान झाले, अशा शेतकºयांनी स्वत:हून नुकसानीची माहिती कृषी विभागाला द्यावी, असे आवाहनही रणविर यांनी केले. शेतकऱ्यांनी धीर न सोडता आलेल्या परिस्थितीचा सामना करून आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तहसीलशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी केले.
दिग्रस तालुक्यात सतत तीन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने डेहणी, माळहिवरा, सेवादासनगर, धानोरा तांडा, मोख, आरंभी, विठाळा आदी परिसरातील पिकांना जबर तडाखा बसला. विशेषत: मंगळवारच्या गारपीटीने गहू, हरभरा, आंबा, टरबूज, केळी, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
खासदार सातव यांचे एसडीओंना निवेदन
उमरखेड, महागाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट व वादळी पाऊस सुरू असल्याने पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी खासदार अॅड. राजीव सातव यांनी केली. या मागणीचे निवेदन उपविभायीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना दिले. गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सोबतच झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची परझड झाली. फळबागा नष्ट झाल्या. पानमळ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना सरसकट ३५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार अॅड. सातव यांनी निवेदनातून केली. निवेदन देताना माजी आमदार विजय खडसे, राम देवसरकर, रमेश चव्हाण, बाळासाहेब चंद्रे, गोपाल अग्रवाल, अरविंद माने, अॅड. शिवाजी वानखेडे आदी उपस्थित होते.