अवाजवी देयकांनी ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: July 29, 2015 02:30 IST2015-07-29T02:30:40+5:302015-07-29T02:30:40+5:30
दर महिन्याला मीटरचे रिडींग न घेता सहा महिन्यातून एकदाच रिडींग देऊन वीज देयके पाठविली जातात.

अवाजवी देयकांनी ग्राहक त्रस्त
वीज वितरणचा कारभार : मीटर रिडींगची पद्धतच चुकीची
मारेगाव : दर महिन्याला मीटरचे रिडींग न घेता सहा महिन्यातून एकदाच रिडींग देऊन वीज देयके पाठविली जातात. त्यामुळे ग्राहकांना अवाजवी देयकांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तक्रार करूनही महावितरण मात्र कारभारात सुधारणा करण्यास तयार नाही.
वीज आता सर्वांसाठीच जीवनावश्यक गरज बनली आहे. विजेच्या बाबतीत ग्राहकही आता जागृत झाले आहे. वीज कंपनीचे देयके तो नेहमी काळजीपूर्वक भरतो. तथापि कंपनी मात्र ग्राहकांच्या बाबतीत नेहमी उदासीन धोरण अवलंबते. महावितरण आपल्या कारभारात सुधारणा करताना दिसून येत नाही. कंपनीच्या या कारभाराने ग्राहक नेहमी असंतुष्ट असतात. वीज कंपनीकडून मिळणाऱ्या देयकाचा काळजीपूर्वक भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र वीज कंपनी ग्राहकांना कधीही काळजीपूर्वक देयके पाठवित नाही, असा ग्राहकांचा अनुभव आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत कर्मचाऱ्यांची कमतरता, हे कारण नेहमी सांगितले जाते. देयके भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वितरण करण्यात येते. बरेचदा तर दर महिन्याला देयकाचे वितरणही होत नाही. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसतो. ग्रामीण भागात नियमित ग्राहकांच्या घरी जाऊन रिडींग घ्यायला कर्मचारी नसतात. बरेचदा रिडींग न घेताच ‘अॅव्हरेज’ देयके पाठविली जातात. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर पुढील महिन्यात कर्मचारी येईल, असे सांगून वेळ मारून नेली जाते. तरीही कर्मचारी रिडींगसाठी पोहोचतच नाही.
आता नुकतेच जुनेच देयके ग्राहकंच्या हाती पडले. अचानकपणे आवाजवी देयके बघून ग्राहक चांगलेच चक्रावून गेले. त्यांचे डोळेच पांढरे झाले. गेल्या सहा महिन्यांपासून मीटर रिडींग न नेताच देयके पाठविली जात होती. आता या महिन्यात रिडींग घेऊन देफके पाठविण्यात आल्याने रिडींग वाढले आहे. रिडींग १०० च्या वर असल्याने जास्तच्या दराचा भुर्दंड ग्राहकांवर बसला आहे. या संदर्भात तालुक्यातील जळका येथील नारायण रोगे यांनी महावितरणच्या अभियंत्याची भेट घेतली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिले.
महावितरण कंपनीचे अभियंते व कर्मचारी प्रथम तर ग्राहकांशी बोलायलाही तयार नसतात. बोलल्यानंतर ग्राहकांचे ऐकूण न घेताच आमचेच बरोबर आहे, हे स्पष्टपणे सांगतात. वीज वितरण कंपनीच्या ताठर भूमिकेमुळे ग्राहकांत प्रचंड रोष आहे. कंपनीने आपल्या कामात सुधारणा करून ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)