दारव्ह्याचे वाटोळे केले, आता यवतमाळचे करणार
By Admin | Updated: October 8, 2014 23:32 IST2014-10-08T23:32:17+5:302014-10-08T23:32:17+5:30
आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ

दारव्ह्याचे वाटोळे केले, आता यवतमाळचे करणार
विधानसभा : संदीप बाजोरिया यांची माणिकराव ठाकरेंवर टीका
यवतमाळ : आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ बुडवायला निघाले आहेत, अशी परखड टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी केली आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आमदार संदीप बाजोरिया यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. त्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन व विकासाद्वारे तेवढीच साथ दिली. त्यामुळे राज्यातील जनता राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जागांवर बाजोरिया यांनी विजयाचा दावा केला आहे.
बाजोरिया म्हणाले, यवतमाळच्या आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांची उमेदवारी डावलून माणिकराव ठाकरे यांनी मुलगा राहुलसाठी दिल्लीत धमकी देत काँग्रेसचे तिकीट आणले. दिग्रस-दारव्हा हा माणिकरावांचा गृह मतदारसंघ ओळखला जातो. याच मतदारसंघाने माणिकरावांना आमदारकी, मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद बहाल केले आहे. त्यांनी आपला आमदारकीचा बहुतांश विकास निधी याच मतदारसंघात खर्ची घातला. मात्र गेल्या दहा वर्षात तेथे शिवसेनेचे नेटवर्क स्ट्राँग झाल्याचे पाहून माणिकरावांनी जणू या मतदारसंघाशी फारकत घेतली आहे. दिग्रस-दारव्हामध्ये आपली डाळ शिजणार नाही, याचा अंदाज घेऊन माणिकरावांनी लोकसभेपासूनच यवतमाळवर वक्रदृष्टी फिरविली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्या प्रचाराचा देखावा निर्माण करून मुळात माणिकरावांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची बांधणी चालविली होती. मतदार याद्या आणि संपर्क क्रमांकाची यादी मिळविण्यासाठीसुद्धा तेव्हापासूनच प्रयत्न सुरू होते.