काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली
By Admin | Updated: September 12, 2015 02:19 IST2015-09-12T02:19:31+5:302015-09-12T02:19:31+5:30
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे.

काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली
यवतमाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार वामनराव कासावार आहेत. लोकसभा व विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पाठविला होता. मात्र तो प्रदेश कार्यालयाकडून स्वीकारला गेला नाही. त्यामुळे आजही ते जिल्हाध्यक्षपदी कायम आहेत. मात्र या पदावर राहण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी बैठकांमध्ये बोलून दाखविल्याने जिल्ह्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. या अध्यक्षपदासाठी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही पुरके यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. नव्या जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता पक्षांतर्गत निवडणुकांना वर्षभर मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. त्यावर आता अॅडव्हॉक (प्रभारी) कमिटी किंवा अॅडव्हॉक जिल्हाध्यक्ष हे दोन पर्याय पुढे आले आहे. कमिटीसाठी प्रदेशकडे तीन नावे पाठवायची की सर्व संमतीने प्रभारी जिल्हाध्यक्षासाठी एक नाव पाठवायचे याचा निर्णय लवकरच नेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार यांची प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती आहे.