मुकुटबन-वणी रस्ता ठरला ‘कर्दनकाळ’
By Admin | Updated: June 5, 2015 00:19 IST2015-06-05T00:19:49+5:302015-06-05T00:19:49+5:30
मुकुटबन ते वणी रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे.

मुकुटबन-वणी रस्ता ठरला ‘कर्दनकाळ’
अतिशय दैनावस्था : खडतर प्रवासाने वाहनधारकांचे मोडते कंबरडे
मुकुटबन : मुकुटबन ते वणी रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे. हा रस्ता आता कर्दनकाळ ठरत असून वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.
वणी ते मुकुटबन व पुढे पाटणबोरीपर्यंत या रस्त्याची पूर्ण एैसीतैसी झाली आहे. याच रस्त्यावर आजी व माजी आमदारांची गावेही आहेत. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन काही कुटुंबे उघड्यावर पडली आहे. घरचा कर्ता पुरूष गेल्यामुळे संसारावर गदा आली की, त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार महोदय याच रस्त्याने संबंधित गावी जातात. तेथे रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला की, प्रस्ताव गेला आहे, केवळ मंजुरी मिळणे बाकी असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते.
या रस्त्यावरील कायरवरून काही अंतरावर पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे गाव आहे. पाटण हे गाव माजी आमदार वामनराव कासावार यांचे आहे. नवीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे लिंगटी हे गावही याच रस्त्यावर आहे. तरीही हा रस्ता प्रचंड दुरवस्थेत आहे. प्रवाशांनी प्रवास करताना किती खड्डे मोजावे, असा प्रश्न पडत आहे.
शेकडो लहान खड्डे गेल्यानंतर एक मोठा खड्डा पडतो आणि नेमका तेथे अपघात होण्याची शक्यता असते. त्यात वाहनधारकाचा जीव जाण्याची शक्यता बळावते. जनतेचे हित लक्षात घेऊन हा तातडीने रस्ता सुरळीत करावा, अशी वाहन चालक व जनतेची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)