आई वाट पाहात राहिली, चिमुकला देवाघरी गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:07+5:30
शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राजेश कुशवाह।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : दररोज शाळा सुटल्यावर ऑटोरिक्षातून घरी येणारा मुलगा आला नाही म्हणून आई आतूरतेने वाट पाहात होती. मात्र मुलगा आलाच नाही. आली ती त्याच्या मृत्यूचीच बातमी. समाजमन सुन्न करणारी ही घटना ऐन बालकदिनीच तालुक्यातील परसोडा येथे घडली.
समर्थ रंजीत पवार असे मृत मुलाचे नाव असून तो आर्णीच्या स्वामी विवेकानंद शाळेत दुसरीत शिकत होता. परसोडा येथील वैशाली पवार यांची दोन्ही मुले आर्णी येथे स्वामी विवेकानंद शाळेत शिकतात. मोठा मुलगा चौथीत तर छोटा समर्थ दुसऱ्या वर्गात होता. हे दोघेही रोज ऑटोरिक्षाने ये-जा करायचे. १४ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर ऑटोरिक्षाने घरी परत निघाले. मात्र शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रोज शाळा सुटल्यावर दहा मिनिटात घरी येणारा समर्थ आजही नक्कीच येईल म्हणून आई वाट पाहात होती. मात्र समर्थ कधीच परत येण्यासाठी निघून गेला होता.
दोन्ही गावे शोकाकूल
समर्थ पवार हा चिमुकला आर्णी तालुक्यातील परसोडा आणि महागाव तालुक्यातील लेकुरवाडी गावकऱ्यांचा लाडका होता. त्याची आई वैशाली ही परसोडाच्या फुलसिंग राठोड यांची मुलगी तर लेकुरवाडीच्या रंजीत पवार यांची पत्नी होय. मात्र रंजीत सध्या कामानिमित्त पुणे, मुंबई या ठिकाणी राहात असल्यामुळे वैशाली दोन्ही मुलांना घेवून वडिलांकडे परसोडा येथे राहात होती. मात्र दोन्ही गावांमध्ये समर्थने जिव्हाळा लावला होता. चिमुकल्या जीवाच्या मृत्यूची वार्ता कळताच दोन्ही गावांवर शोककळा पसरली.