कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर
By Admin | Published: October 12, 2014 11:38 PM2014-10-12T23:38:02+5:302014-10-12T23:38:02+5:30
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे
![Low power of electricity hits the life of farmers | कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर Low power of electricity hits the life of farmers | कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर
पांडुरंग भोयर ल्ल सोनखास
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे. सध्या खरिपाच्या पिकाला पाण्याची गरज आहे. मात्र कमी दाबाची वीज असल्याने मोटरपंप सुरू होत नाही तर काही ठिकाणच्या मोटारी जळल्या आहेत. एकूणच हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मात्र केबीनमध्ये बसून कारभार चालवित असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे.
उशिराचा पाऊस, दुबार-तिबार पेरणी आदी कारणांमुळे परिसरातील शेतकरी हैराण झाला आहे. पुढे झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन आदी पिके कशीबशी जगली. आता तीव्र उन्हामुळे जमिनी कडक आल्या आहेत. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. अशा स्थितीत या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, ते आटापिटा करून ही पिके जगविण्याचा प्रयत्न करत असतानाच कमी दाबाची वीज या प्रयत्नात आड येत आहे.
परिसरात अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटरपंप सुरूच होत नाही, झाल्या तरी जळतात. या परिसराला मालखेड(खु) फिडरवरून वीज पुरवठा होतो. उत्तरवाढोणा, सोनवाढोणा, सोनखास, हेटी आदी भागांना या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा तडाखा बसत आहे. थ्री फेजवर चालणारी उपकरणे पूर्णत: निकामी होत असून जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
मोटरपंप जळत असल्याने शेतकरी आपल्या पिकाला पाणी देवू शकत नाही. त्यामुळे पिके वाळण्याची भीती आहे. आर्थिक अडचणींमुळे जळालेल्या मोटारी दुरुस्त करण्याची सोयही अनेकांकडे नाही. त्यामुळे डोळ्यासमोर वाळणाऱ्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांच्या हृदयात धस्स होत आहे. विद्युत कंपनीचे अधिकारी मात्र यावर कुठलाही उपाय शोधण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.