२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:11 PM2018-03-14T13:11:07+5:302018-03-14T13:11:29+5:30
पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.
![Lakhs of cotton growers in 20 districts will lose their help | २० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार Lakhs of cotton growers in 20 districts will lose their help | २० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/14-cotton-flower-1361052_20180366857.jpg)
२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुलाबी बोंडअळीची मदत देताना पाच वर्षाचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना आहेत. पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी ३७ हजार ५०० रूपयांची मदत जाहीर केली. यासंदर्भात महसूल, वन विभागाने धक्कादायक अध्यादेश काढला. या अध्यादेशात हेक्टरी ६८०० रूपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याकरिता पाच वर्षांचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत झालेले नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त राहिल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसानीचे प्रमाण ३३ टक्केपेक्षा कमी राहिल्यास शेतकरी अपात्र ठरविण्याच्या सूचना आहेत. यामुळे सर्वेक्षणातून मदतीस पात्र ठरलेले शेतकरी हेक्टरी सरासरीच्या उत्पादन मर्यादेने बाद झाले आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मदतीमधून बाद होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा लाखांच्या घरात आहे.
ब्रिटिशकालीन आणेवारी घातकच
आणेवारीकरिता ब्रिटिशकालीन पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पध्दती बदलविण्यासाठी मंत्री, आमदारांनी आंदोलन केले होते. प्रत्यक्षात सत्तांतरानंतरही ब्रिटिशकालीन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. याच पद्धतीच्या अवलंबाने २० जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.