मशागतीची कामे ठप्प
By Admin | Updated: April 25, 2015 01:58 IST2015-04-25T01:58:53+5:302015-04-25T01:58:53+5:30
बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिवाय शेतमालाला बाजारपेठेत अतिशय कमी दरात विकावे लागत असल्याने लागवड खर्चही हाती येत नाही.

मशागतीची कामे ठप्प
पांडुरंग भोयर सोनखास
बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिवाय शेतमालाला बाजारपेठेत अतिशय कमी दरात विकावे लागत असल्याने लागवड खर्चही हाती येत नाही. अशी स्थिती गेल्या तीन वर्षापासून कमी-अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाचे तांडव अद्यापही सुरूच आहे. यामुळे हादरलेल्या शेतकऱ्याने अद्यापही मशागतीच्या कामाला सुरूवात केली नाही. हजारो एकर जमीन पडीत ठेवण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे.
नेर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सोनखास या गावाला लागून किमान एक हजार ५०० एकर शेतजमीन आहे. परिसरातील इतरही गावांचा यात समावेश आहे. लहान-मोठा आणि मध्यम अश्या तिन्ही प्रकारचे शेतकरी येथे आहे. सातत्याने होत असलेल्या नापिकीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी चक्क जमीन पडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जमीन कसने शक्य नसल्याने ज्याच्याकडे ५० एकर शेत आहे तो शेतकरी १० ते १५ एकरातच लागवड करण्याची तयारी करत आहे. शेती हा अनेकांच्या उपजिवीकेचा आधार असला तरी आता त्यातून पोटाची खळगी भरने शक्य होत नसल्याचे दिसत असल्याने
अनेकांनी शेतीतून काढता पाय घेतला आहे.
शेती कसताना मोठे भांडवल जवळ असणे आवश्यक आहे. याशिवाय योग्य दर्जाचे बी-बियाणे मिळणे, खतांची टंचाई सर्वात महत्वाचे म्हणजे वेळोवेळी शेतमजूर न मिळाल्यामुळे होणारे नुकसान, वन्य प्राण्यांचा त्रास या सर्व संकटांवर मात करूनही शेतकरी आपली जमीन कसत आला. आता मात्र निसर्गाच्या ऋतुचक्रातच बदल झाल्याचे दिसत आहे. संपूर्ण वर्षभर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जवळपास सर्वच पिके उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत बाजारपेठेत किमान शेतमालाचा भाव चांगला असणे अपेक्षीत होता, मात्र एकीकडे नापिकी आणि हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत असतानाच दुसरीकडे बाजारमूल्यही झपाट्याने कमी झाले. शेतकऱ्यांची अडचण ओळखून व्यापाऱ्यांनी पडेल भावात धान्याची खरेदी केली. कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, तूर या धान्याचे भाव व्यापाऱ्याच्या मर्जीनेच ठरविण्यात आले. लावलेला खर्चही निघाला नाही. या परिस्थितीला सातत्याने तीन वर्षापासून शेतकरी तोंड देत आहे. आता मात्र तो मेटाकुटीस आला असून, झेपेल तेवढीच शेतजमीन कसायची या मानसिकतेत आहे.
मक्ता, बटईचे दर घसरले
२० एकरापेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी, नोकरदार शेतकरी आपली शेतजमीन मक्ता, बटईने देत होते. यावर्षी मात्र मक्ता, बटईने जमीन करण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच कोरवाहू जमिनीचा मागील वर्षी एक एकराचा मक्ता तीन हजार रुपये होता. तो यावर्षी दीड ते दोन हजारावरच आला आहे. ओलिताच्या शेतीलाही पाच हजारा ऐवजी आता तीन हजार रुपये देण्यासाठीसुद्धा कुणी तयार नाही. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याचे जाणकार शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यांत्रिकीकरणाने रोखीचा व्यवहार
पूर्वी परंपरागत पद्धतीने शेतीची मशागत केली जात होती, तेव्हा बैलांचा उपयोग होत होता. आता मात्र शेतमजूर व सालगडी मिळत नसल्याने शेतीची मशागत ट्रॅक्टरव्दारेच करावी लागते. डिझलचे दर लक्षात घेता शेतकऱ्याला नगदी पैसे मोजून द्यावे लागतात. याशिवाय इतर कामांसाठीसुद्धा शेतकऱ्यांना रोखीचाच व्यवहार करावा लागतो. उत्पन्नासाठी मात्र वर्षभर वाट पाहावी लागते.