जिल्ह्यात पहिल्यांदाच दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:20 IST2019-07-30T21:20:14+5:302019-07-30T21:20:58+5:30

यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Heavy rain for the first time in the district | जिल्ह्यात पहिल्यांदाच दमदार पाऊस

जिल्ह्यात पहिल्यांदाच दमदार पाऊस

ठळक मुद्देसरासरी ३६ मिमी पावसाची नोंद : पिकांना जीवदान, धरणांना अजूनही प्रतीक्षा, वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने काही नदी, नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी वाहतूक थांबली आहे. मात्र धरणातील जलसाठा वाढण्यासाठी यापेक्षाही मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत साधारणत: ४४८ मिमी पाऊस बरसतो. यापर्षी प्रत्यक्षात १८४ मिमी पाऊस बरसला. सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५२ टक्याने कमी आहे. पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक झाली होती. सोमवार-मंगळवारचा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. मात्र काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात गत २४ तासापासून ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलप्रकल्पामध्ये २५ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. हा पाऊस आणखी असाच बरसला तर प्रकल्प भरण्यास वेळ लागणार नाही.

तालुकानिहाय पाऊस
यवतमाळ १६ मिमी, बाभूळगाव १२ मिमी, कळंब २० मिमी, आर्णी ५९ मिमी, दारव्हा १६ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, दिग्रस २७ मिमी, नेर १० मिमी, पुसद १७ मिमी, उमरखेड २७ मिमी, महागाव २२ मिमी, केळापूर ८० मिमी, घाटंजी ५२ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ५० मिमी, मारेगाव ५९ मिमी, झरीमध्ये ५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मान्सूनपूर्व उपाययोजनांचा बोजवारा
नगरपरिषदेने मान्सूनपूर्व कामांकडे प्रचंड दुर्लक्ष केले. त्याचे दुष्परिणाम मंगळवारच्या पावसादरम्यान नागरिकांना भोगावे लागले. नगरपरिषदेने सफाई न केल्याने शहरात मंगळवारी जागोजागी पावसाचे पाणी साचले. हे पाणी अडून वस्त्यांमध्ये शिरले. पाण्याचा निचरा करण्यासाठी आता ऐनवेळी नगरपरिषदेने चार सदस्यांचे पथक तयार केले. एक जेसीबी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. या पथकाने मंगळवारी दिवसभर विविध भागात सफाई मोहीम राबविली. मात्र हेच काम पावसापूर्वी का केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
 

Web Title: Heavy rain for the first time in the district