आगीत हार्डवेअर भस्मसात
By Admin | Updated: November 20, 2014 22:59 IST2014-11-20T22:59:00+5:302014-11-20T22:59:00+5:30
शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांनी लागलेल्या आगीने अचानक रौद्र रुप धारण केले. पाहता पाहता हार्डवेअर आणि गोदाम या आगीने आपल्या कवेत घेतले. आगीचे लोळ पाहून

आगीत हार्डवेअर भस्मसात
यवतमाळ : शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांनी लागलेल्या आगीने अचानक रौद्र रुप धारण केले. पाहता पाहता हार्डवेअर आणि गोदाम या आगीने आपल्या कवेत घेतले. आगीचे लोळ पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. या भीषण आगीत संबंधित व्यावसायिकाचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. रात्री ९.३० वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यात तब्बल साडेतीन तासाने यश आले. अग्नीशमन दलाने १८ बंब पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. मात्र तोवर दुकानातील आणि गोदामातील सर्वच साहित्य जळून खाक झाले होते. ही घटना येथील आर्णी मार्गावर बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
आर्णी मार्गावर शाम मुंधडा रा. यवतमाळ या व्यावसायिकाचे परफेक्ट नामक बिल्डींग मलेरियल आणि हार्डवेअरचे दुकान आहे. त्याला लागूनच गोदामही आहे. नेहमी प्रमाणे बुधवारी रात्री ते दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. दरम्यान अचानक दुकानात शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटच्या ठिणग्यांनी दुकानात आग लागली. ही बाब लक्षात येण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले. दुकानामध्ये आॅईल पेंटचे डबे, मशीन, प्लॅस्टिक पाईप, नॉयलॉन आणि सुती दोऱ्या, टरपेनटाईन, प्लॅस्टिकच्या टाक्या अशा आग आकर्षित करणाऱ्या वस्तू असल्याने आग पसरण्यास वेळ लागला नाही. ही बाब लक्षात येताच संबंधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला दिली. या घटनेची तत्काळ दखल घेत अग्नीशमन पथकाने बंबासह घटनास्थळ गाठले. एका पाठोपाठ एक असा १८ बंब पाण्याचा मारा करण्यात आला. तेव्हा कुठे ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत दुकानातील साहित्य, कलर पेंट, टाक्या, टीनपत्रे, कलर तयार करण्याची मशीन, बिल्डींग मटेरियल, मालवाहू आॅटोरिक्षा आदी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये व्यावसायिक शाम मुंधडा यांचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच तेथे बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती. त्यामुळे काही काळ आर्णी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. जमावाला नियंत्रित करण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान गुरुवारी येथील तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. मात्र वृत्तलिहेस्तोवर या प्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार अथवा माहिती देण्यात आली नव्हती. या संदर्भात व्यावसायिक शाम मुंधडा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशम पथकातील नुरुद्दीन काझी, यशवंत चंदनखेडे, यशवंत पाटील, उल्हास फटींग, अनिल बोबडे, अविनाश माकडे, दिलावर खा, अजय गुजरे आदींनी प्रयत्न केले. दरम्यान गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत दुकानातून धूर निघतच होता. त्यामुळे पाण्याचा मारा केला. (स्थानिक प्रतिनिधी)