शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे

By Admin | Updated: July 6, 2015 02:38 IST2015-07-06T02:38:01+5:302015-07-06T02:38:01+5:30

हवामानाच्या बदलासोबतच कृषीचे तंत्रही बदलत आहे. या बदलासोबत शेतकऱ्यांनी बदल करणे आवश्यक आहे.

Enrich the new technology of farming | शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे

शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे

दिनेशकुमार जैन : कृषी प्रदर्शन व परिसंवाद
यवतमाळ : हवामानाच्या बदलासोबतच कृषीचे तंत्रही बदलत आहे. या बदलासोबत शेतकऱ्यांनी बदल करणे आवश्यक आहे. अलिकडे शेतीक्षेत्रात आलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अंगिकार करण्यासोबतच आधुनिक पध्दतीने शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी केले.
कृषी जागृती सप्ताहानिमित्त बचत भवन येथे कृषी प्रदर्शनी व शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्गाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, कृषी विकास अधिकारी जगन राठोड उपस्थित होते.
सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व दालनांची पाहणी करण्यात आली. अजुनही ५५ टक्के नागरिक शेती करतो. त्यामुळे शेती व्यवसायाकडे कदापी दुर्लक्ष करता येत नाही. शेती क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना व अनुदानाचे कार्यक्रम राबविते. अलिकडे हवामानातील बदलामुळे शेती पिकांवर परिणाम होत आहे. या बदलानुसार शेतकऱ्यांनीही बदलने आवश्यक असून तशी पिकपध्दती व तंत्रज्ञान अंगिकारावे, असे जैन म्हणाले.
एकापेक्षा जास्त पिके घेता यावे म्हणून शेतकऱ्यांनी शाश्वत सिंचनाच्या सोईकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे बांधण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. शेततळे उभे राहिल्यास एकापेक्षा जास्त पिके घेता येईल, पयार्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होणार आहे. शेततळ्यांच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्याची सूचना यावेळी जैन यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कॉल सेंटरची योजना राबवित आहे. तसेच हवामान आधारीत सल्ला, पाऊस पाण्याचा अंदाज याबाबतची माहिती शेतकऱ्यांना विनामुल्य दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून घ्यावी, असेही जैन यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परिक्षण करावे. कृषी विभागाच्या ग्रामीण पातळीवरील सहाय्यकांनी शेतकऱ्यांशी संपर्क वाढवावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यास त्यांना मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांनी स्वत: बियाणे तयार करावे, असे सांगितले. बियाण्यांसोबतच कृषी उत्पादन कंपन्या शेतकऱ्यांच्या तयार झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी अधिक मेहनतीची तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. कलशेट्टी यांचेही भाषण झाले. (शहर वार्ताहर)
सचिवांची पाठ फिरताच प्रदर्शनी गुंडाळली
रविवारी आयोजीत कृषी प्रदर्शनीला शेतकऱ्यांची प्रचंडी गर्दी झाली होती. अप्पर मुख्य सचिवांनी कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन केले. त्यांचे मार्गदर्शनपर भाषण आटोपताच अप्पर सचिव परतले. अप्पर सचिव परतताच प्रदर्शन गुंडाळण्यात आले. ४ वाजताच्या सुमारास या प्रदर्शनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
अनेक शेतकरी अनभिज्ञ
कृषी सप्ताहानिमित्त कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाची पूर्व प्रसिद्धीच करण्यात आली नाही. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना सोडाच प्रसिद्धी माध्यमातील प्रतिनिधींनाही या कार्यक्रमाची माहिती अगदी एक दिवस अगोदर मिळाली. यावरून कृषी विभागाच्या नियोजनातील फोलपणा दिसून येते.

Web Title: Enrich the new technology of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.