चार दिवसांत कपाशी, सोयाबीन फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:22 IST2018-07-01T22:21:25+5:302018-07-01T22:22:12+5:30
गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकºयांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.

चार दिवसांत कपाशी, सोयाबीन फस्त
राजेश कुशवाह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.
गेल्यावर्षीच्या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी आटोपली. अनेक शेतात बियाणे अंकुरले. या पिकाला शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहे. मात्र आता कपाशीवर वाणीने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. गेल्या चार दिवसात १०० एकराच्यावरील क्षेत्रातील कपाशी वाणीने फस्त केली आहे. पावसाअभावी वाणीने कपाशीला पोखोरणे सुरू केले आहे. अंकुरलेल्या कपाशीवर ही कीड आक्रमण करीत आहे. अचानक शेतात आलेल्या वाणीमुळे शेतकरी धास्तावले आहे. गेल्या चार दिवसांपासून कपाशी उध्वस्त होत आहे.
कपाशीसोबतच वाणीने जवळपास १७ एकरामधील सोयाबीन गिळंकृत केले आहे. जमिनीत पेरलेले बियाणे ही कीड गिळंकृत करीत आहे. त्यामुळे सोयाबीण उवण होतच नाही. बियाणे उगवले तर वाणीने पुन्हा ते फस्त करते. यामुळे १७ एकरातील सोयाबीन उध्वस्त झाले आहे. अंकुरलेल्या सोयाबीनवर दहा ते १५ कीटक एकत्रितपणे हल्ला करतात. यावर कोणत्याही औषध फवारणीचा फरक परत नाही. दुबार पेरणी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.
१२ वर्षांपूर्वी केले होते आक्रमण
१२ वर्षांपूर्वी २००५ मध्ये तालुक्यातील साकूर परिसरात वाणीने पिकावर आक्रमण केले होते, असे वृद्ध शेतकरी मोरेश्वर पाटील, विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. त्यावर्षी एका रात्रीतून पीक उध्वस्त झाले होते. तिच अवस्था यावर्षी दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांवर दुपार पेरणीचे संकट घोंगावत असल्याचे साकूरचे सरपंच बाबाराव चव्हाण यांनी सांगितले.