ऊस पळवापळवीची स्पर्धा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:36 IST2017-12-02T23:35:15+5:302017-12-02T23:36:28+5:30
परिसरातील शेतात उभ्या असलेल्या पाच लाख मेट्रिक टन ऊसाला सध्या कुणीच वाली नाही. ही संधी हेरून खासगी आणि सहकारी कारखानदारांनी एकजूट केली अन् ऊस उत्पादकांना नागवण्याचा गणिमी कावा रचला.

ऊस पळवापळवीची स्पर्धा संपली
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : परिसरातील शेतात उभ्या असलेल्या पाच लाख मेट्रिक टन ऊसाला सध्या कुणीच वाली नाही. ही संधी हेरून खासगी आणि सहकारी कारखानदारांनी एकजूट केली अन् ऊस उत्पादकांना नागवण्याचा गणिमी कावा रचला. हा कावा आता फळाला येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्यावर्षी महागाव, पुसद, उमरखेड, हदगाव, कळमनुरी भागात बाराशीव, पुणे येथील सहकारी, तर टोकाई-वसमत, डेक्कन-मांगूळ, हुतात्मा-हदगाव, गंगाखेड आणि महागावच्या नॅचरल शुगर या खासकी कारखान्यांमध्ये ऊस पळवण्याची मोठी स्पर्धा लागली होती. तथापि नॅचरल शुगरने मोळी पूजनालाच अडीच हजार रुपयाचा दर जाहीर केला होता. मात्र यंदाच्या हंगामात ऊस पळविण्याची स्पर्धा नाही. कारण कारखानदारांनी एकजूट केली आहे. त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे.
शेतकºयांचा ऊस लागवडीचा खर्च कमी झालेला नाही. उलट खताचे दर वाढले. मात्र कारखानदार ऊसाला किती भाव देणार, याबाबत अद्याप चुप्पी साधून आहेत. ऊसाच्या दराबाबत खासदार राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन केले. त्यामुळे तेथील कारखानदारांनी अडीच हजारांचा पहिला हप्ता देण्याचे कबूल केले. मात्र जेथे शेतकºयांचे आंदोलन नाही, अशा ठिकाणी कारखानदारानी अजूनही भाव जाहीर केला नाही. पहिला हप्ता किती देणार हेसुद्धा घोषित केले नाही. त्यामूळे अडीच हजारांच्यावर दर मिळण्याची शक्यता दुरावताना दिसत आहे.
महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यात ऊस उत्पादकांसाठी प्रामाणिकपणे झगडणारे नेतृत्व नाही. त्यामूळे परिसरातील साखर कारखानदारांची गुर्मी वाढली आहे. गतवर्षी नॅचरल शुगरने अडीच हजार रूपयांचा दर दिला होता. मात्र यंदा त्यांनी अद्याप दर घोषित केले नाही. त्यामुळे महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
३२०० रूपये दराची अपेक्षा
नॅचरल शुगरकडे एक ते दीड लाख मेट्रिक टन गाडीबैलाचे क्षेत्र आहे. त्यामुळेच ताजा ऊस मिळत असून १४ टक्क्यांनी ऊस तोड सुरू आहे. प्रामाणिकपणे रिकव्हरी काढली, तर गाडीबैलाचे क्षेत्र आणि ताजा ऊस वाहतुकीवर होणारा कमी खर्च बघता नॅचरल शुगर किमान ३२००रूपये दर देऊ शकते. मात्र रिकव्हरी पाहणे आणि ती तांत्रिक पद्धतीने समजून घेणे, सामान्य शेतकºयांना जमणार नाही. बाराशीव, पुणे येथील साखर कारखान्यांनी २०० किलोमीटर अंतरावरून ऊस नेला. तरीही त्यांनी अडीच हजार दर दिला. येथे गाडीबैलाचे क्षेत्र असूनही जादा दर का देता येत नाही, असा शेतकºयांचा सवाल आहे.