विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप मागील वर्षी याच एप्रिल महिन्यात शिगेला होता. २० ते ३० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल ३५१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरली असली तरी राजकीय विद्वेषाचा वणवा मात्र भडकलेला आहे. त्यामुळेच कोरोना संकटातून आम्ही नक्की काय शिकलो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावाधाव करावी लागायची. कोरोनाने अनेक जीव घेणे प्रश्न सर्वांसमोर उभे केले होते. एकीकडे औषधांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना नसलेल्या रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे ? असाही प्रश्न निर्माण झाला होता. वाढत्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवाही सकाळी ११ पर्यंतच ठेवण्यात आली. दुसरीकडे मेडिकलमधील खाटाही फुल्ल झाल्याने अतिरिक्त खाटांचे नियोजन सुरू झाले. त्या लाटेत प्रत्येकाच्या घरातील,नात्यातील अथवा मित्रमंडळीतील एखाद्याला तरी कोरोनाने संपविले होते. अशा भयानक स्थितीत माणूस जगला पाहिजे, कोरोनाची लाट ओसरली पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. यंदा कोविड लाट ओसरलेली आहे. कोविडनंतर लोक बदलतील, संकटातून बाहेर पडून पुन्हा उभे राहतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र यंदाच्या एप्रिलमध्ये आपण किळसवाण्या राजकारणाचा उन्माद अनुभवतो आहोत. अशा स्थितीत जगण्याचे प्रश्न मागे पडत आहेत.
शेजार धर्म गेला कुठे ?
- मागील वर्षी सर्वजण बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी झगडत होते. यंदा मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकारणाचा फड रंगला आहे.
- कोरोनाने कमी पैशांत घर चालविता येते. कुटुंबासह एकत्र तणावमुक्त जगा, तसेच संकटाच्या काळात शेजार धर्म कसा पाळायचा, हे शिकविले. यंदा हे सगळेच विसरून द्वेषाचे राजकारण सुरू आहे.