पांढरकवडात बैलजोडींची खरेदी-विक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:17+5:30
पांढरकवडा बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात तेलंगणासह यवतमाळ जिल्ह्यातील व आजुबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारापर्यंत असायचा. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येथील गुरांच्या बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यात लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाऱ्या शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पांढरकवडा बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात तेलंगणासह यवतमाळ जिल्ह्यातील व आजुबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारापर्यंत असायचा. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र अजुनही शेतीच्या बऱ्याच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर गावात शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते.
बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील व ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत.
त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान, पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.