५० गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:12+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून धरणात ७८.७७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

५० गावांना सतर्कतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात ८२ टक्के जलसाठा झाला आहे. पैनगंगा नदीवर हे धरण निर्माण करण्यात आले. संततधार पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीकाठावरील तालुक्यातील ५० गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून धरणात ७८.७७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मात्र तूर्तास धरणाचा कोणताही दरवाजा उघडला नाही. तथापि, तहसील प्रशासनाने नदी काठावरील ५० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पैनगंगा दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगा आणि कयादू या दोन नद्यांचा तालुक्यातील चिंचोली येथे संगम होतो. यामुळे नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. परिणामी काठावरील सुमारे ५० गावांना धोका होण्याची शक्यता आहे. मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, मानकेश्वर, कोपरा, सिंदगी, गाडी (वन), बोरी, सावळेश्वर, मुरली, येदापेंदा, खरबी आदी ५० गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
अद्याप धरणाचा दरवाजा उघडला नाही
इसापूर धरणात पाणीसाठा वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अद्याप धरणाचा कोणताही दरवाजा उघडण्यात आला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पूरनियंत्रण कक्ष प्रमुख तथा उपविभागीय अभियंता हनुमंत धुळगंडे यांनी केले आहे. तो व्हिडीओ इसापूरचा नसल्याचे स्पष्ट केले.
तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. संबंधित पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायकांना तत्पर राहण्याचे आदेश दिले.
- रूपेश खंडारे
तहसीलदार, उमरखेड