साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:31 IST2018-11-15T19:31:11+5:302018-11-15T19:31:24+5:30

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष.

45-year history of literature exhibition | साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

यवतमाळ -  साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष. आता ९२ व्या संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळातच ग्रंथप्रदर्शनाच्या परंपरेलाही ४५ वर्षे पूर्ण होत आहे.

येत्या जानेवारी महिन्यात ११, १२ आणि १३ रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन हे जसे साहित्यिकांचे असते, तसेच रसिकांचेही असते. त्यामुळेच संमेलनस्थळी दरवर्षी कोट्यवधींच्या पुस्तकांची विक्री होत असते. आता यवतमाळच्या संमेलनातही ग्रंथप्रदर्शन भरविण्यासाठी अयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 

१९७३ साली यवतमाळात कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी पहिल्यांदाच यवतमाळच्या पावनभूमीत ग्रंथप्रदर्शनाचे रोपटे लावण्यात आले. आज ४५ वर्षानंतर या उपक्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले. जेव्हा पहिल्यांदा यवतमाळात संमेलन झाले, त्यावेळी अवघ्या एका वर्गखोलीत पुस्तकांचे दोन स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी एक होता ‘मौज’ प्रकाशनाचा, तर दुसरा होता महाराष्ट्र शासनाचा. या छोट्याशा ग्रंथप्रदर्शनाला त्यावेळी सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, आणि यशवंतराव चव्हाण आदींनी भेटी दिल्याचे ‘मौज’चे प्रतिनिधी अरुण गाडगीळ यांनी सांगितले. 

यवतमाळात होऊ घातलेल्या ९२ व्या साहित्य संमेलनाचे ग्रंथप्रदर्शन हे एक आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. यवतमाळ ते यवतमाळ हा ४५ वर्षांचा ग्रंथप्रदर्शनाचा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत अरुण जाखडे यांनी ‘गोंदण’ स्मरणिकेच्या लेखातून व्यक्त केला आहे.

Web Title: 45-year history of literature exhibition

टॅग्स :marathiमराठी