जिल्हा मध्यवर्ती बँकेत १५ कोटींचा गैरव्यवहार; पाच वर्षांत सहा प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:21 IST2025-06-13T20:20:56+5:302025-06-13T20:21:20+5:30

साडेअकरा कोटींची वसुली बाकी : वसुली चार कोटींची, फौजदारी कारवाईत चालढकल

15 crore fraud in District Central Bank; Six cases in five years | जिल्हा मध्यवर्ती बँकेत १५ कोटींचा गैरव्यवहार; पाच वर्षांत सहा प्रकरणे

15 crore fraud in District Central Bank; Six cases in five years

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा शाखेत तब्बल १४ कोटी ८४ लाख दोन हजार ९०० रुपयांचा गैरव्यवहार आणि अफरातफर झाली आहे. काही प्रकरणांत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. मात्र, अजूनही अनेकांवर फौजदारी कारवाई झाली नाही. गैरव्यवहार करणाऱ्यांकडून केवळ तीन कोटी ७५ लाख ९ हजार ६५४ रुपयांचीच रिकव्हरी आहे. बँक प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याने घोटाळे थांबणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दिग्रस तालुक्यातील कलगाव आणि पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेतील गैरव्यवहार सध्या चांगलाच गाजत आहे. या ठिकाणी बँकेकडून लेखापरीक्षण करण्यात आले. कलगाव शाखेत सुमारे ७८ लाखांचा गैरव्यवहार चौघांनी केल्याचा अहवाल एजन्सीने सादर केला. त्यानंतर निलंबन करून संचालक मंडळाच्या बैठकीत फौजदारी कारवाईचा ठरावही घेण्यात आला. परंतु, अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही. येथील सचिवाचेही निलंबन केले आहे. जांब बाजार शाखेत पाच कोटींच्या वर गैरव्यवहार झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले. येथील गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने पुन्हा लेखापरीक्षण केले जात आहे. याचा अहवाल प्राप्त होताच अपहाराची निश्चित रक्कम समोर येणार आहे.


दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

  • एकूणच शेतकऱ्यांच्या बँकेतील रकमेवर दरोडा घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई अपेक्षित होती. परंतु, रिकव्हरीच्या नावावर चुटपूट रक्कम भरून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे.
  • गत बैठकीत फौजदारीवरून काही संचालक आक्रमकही झाले होते. रक्कम भरली म्हणून कारवाई करायची नाही का, असा सवालही काही संचालकांनी केला होता. त्यानंतरही प्रशासन भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


साडेअकरा कोटींची वसुली बाकी
सहा शाखेत एकूण १४ कोटी ८४ लाख दोन हजार ९०० रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. यातून आर्णी ३६ लाख ७४ हजार ८५८, हिवरा सोसायटी कर्ज ८९ लाख ७५ हजार ३९४, हिवरा २२ हजार १००, दिग्रस एक कोटी २४ लाख १७ हजार ६५८, कलगाव ३२ लाख ३८ हजार ८४४ आणि जांब बाजार प्रकरणात २४ लाख ३० हजार ८०० रुपयांची वसुली केली आहे. उपदान, पगार, सुरक्षेचे एकूण ८८ लाख ४४ हजार ९९४ रुपये आहेत. अजूनही ११ कोटी ५२ लाख ९८ हजार १६७ रुपयांची वसुली बाकी आहे. 

Web Title: 15 crore fraud in District Central Bank; Six cases in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.