वाशिम जिल्हावासीयांच्या ‘अपेक्षा एक्सप्रेस’ने ट्रॅक सोडला
By Admin | Updated: July 8, 2014 22:40 IST2014-07-08T22:40:50+5:302014-07-08T22:40:50+5:30
रेल्वे अर्थ संकल्पाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांचा तुर्तास भ्रमनिरास झाला आहे.

वाशिम जिल्हावासीयांच्या ‘अपेक्षा एक्सप्रेस’ने ट्रॅक सोडला
वाशिम : जिल्हयाला विकासाच्या पथाला पोहोचविणारा वाशिम-बडनेरा लोहमार्ग, वाशिम-जालना लोहमार्ग, एकेकाळी वर्हाडाची लाईफलाईन संबोधल्या जाणार्या परंतु आजमीतीला वनवास भोगत असलेल्या शंकुतलेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर, वाशिममार्गे जाणार्या लांब पल्याच्या नव्या गाड्या व शहरातील रेल्वे उडडान पुलासाठी रेल्वे अर्थ संकल्पाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांचा तुर्तास भ्रमनिरास झाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पातून मुख्य मागण्यांना बगलच मिळाल्यामुळे एक प्रकारे जिल्हावासीयांच्या ह्यअपेक्षा एक्सप्रेसह्णने अचानक ट्रॅक सोडल्याचे दिसून येते. केंद्र शासनाच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी ८ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प मांडला. जिल्हावासियांना या अर्थसंकल्पातून काहीतरी पदरात पडेल, अशा अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात मात्र वाशिम जिल्ह्यासाठी कोणतीच घोषणा झाली नसल्याने जिल्हावासियांचा अपेक्षाभंग झाला. नॅरोगेज मध्ये रुपांतर झाल्यानंतर अकोला ते पूर्णा या रेल्वे मार्गावरुन अनेक रेल्वेगाडया मागील काही वर्षा पासून धावत आहेत. सदर रेल्वे मार्गावरुन लांब पल्याच्या नविन रेल्वे गाडया सुरु करण्यात याव्या व वाशिम ते बडनेरा हा केवळ ९0 किलोमिटरचा नविन मार्ग निर्माण करण्यात यावा अशी मागणी जिल्हावासियांनी केली होती. याशिवाय खासदार भावना गवळी यांनी देखील सदर लोहमार्गावरुन लांब पल्याच्या गाडया सुरु करण्यासाठी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. आजच्या अर्थसंकल्पाने जिल्हावासियांचा पुरता भ्रमनिरास केला आहे.
** शकुंतलेचा वनवासही कायमच
वर्हाडातील पांढरे सोने विकण्यासाठी सन १९१३ मध्ये मुर्तीजापूर वरुन यवतमाळ पर्यंत इंग्रजांनी सुरु केलेल्या शंकुतला आजमीतीला शापित दिवस कंठीत आहे. सदर लोहमार्ग व त्यावर धावणार्या रेल्वे गाडीच्या देखभाल तथा दुरुस्तीचा खर्च मिळणार्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचा कांगावा करीत रेल्वे प्रशासनाकडून या लोहमार्गावर शेवटचा खिळा ठोकण्याचा घाट रचल्या जात आहे. सदर नॅरोगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करुन त्यावर लांबपल्याच्या गाडया सुरु केल्यास वर्हाडाच्या विकासासाठी कमालीचाहातभार लागू शकतो. जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करुन शंकुलेला संजीवणी देण्यासाठी कंबर कसल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा घाट ओलांडून शंकुतला ब्रॉडगेजच्या ट्रॅकवर येईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. त्यामुळे सर्वांचा नजरा रेल्वे अर्थसंकल्पाकडे होत्या. परंतु अर्थसंकल्पात शकुंतलेसाठी तरतूदच नसल्यामुळे शंकुतलेचा वनवास कायम राहणार आहे
. ** बडनेरा- वाशिम लोहमार्ग सायडींगलाच
उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा प्रस्तावित बडनेरा- वाशिम मार्ग गत ९ वर्षापासून दुर्लक्षीत आहे. रेल्वे विभागाने गत ४ त ५ वर्षापूर्वी या लोहमार्गाचे सर्व्हेक्षण पुर्ण केले होते. मात्र आजपावेतो या लोहमार्गासाठी भरीव निधीची तरतूद झालेली नाही. परिणामी सदर लोहमार्गाच्या सर्व्हेक्षणानंतर तमाम सोपस्कार ठप्प आहे. हा लोहमार्ग जिल्हयाच्या विकासाला हातभार लावणारा तथा औद्योगीक क्षेत्राला चालणारा देणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या लोहमार्गासाठी निधी उपलब्ध होईल अशी जिल्हावासीयांना अपेक्षा होती. तथापी अर्थसंकल्पात हा लोहमार्ग सायडींगला ठेवण्यात आल्याने सर्वांचा भ्रमनिराश झाला आहे.
** उड्डान पुलाच्या विषयाला हातच नाही
अकोला ते पूर्णा या लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर झाल्यानंतर स्वाभावीकच या मार्गावर धावणार्या लांब पल्याच्या गाडयांची संख्या वाढली. परिणामी रेल्वेच्या वेळेत पुसद व हिंगोली मार्गावर असलेल्या रेल्वेगेट जवळ वाहतूकीची कोंडी वाढली आहे. गेट बंद असतांना येथे वाहन धारकांना नाहक ताटकळत उभे राहावे लागते.दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागते. त्यामुळे येथे उडड्डान पुल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. रेल्वेच्या समितीने गत वर्षी येथील दोन्ही रेल्वे क्रॉसींगचे सर्व्हेक्षण केले होते. उड्डाण पुलाबाबत आश्वासनही दिले होते. त्यामुळे अर्थ संकल्पात उड्डान पुलासाठी तरतूद होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र जिल्हावासियांची अपेक्षा फोल ठरली आहे. उड्डाणपूल हे एक स्वप्नच ठरत आहे.