सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:17+5:302021-09-10T04:50:17+5:30
साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. ...

सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा घटला
साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. परंतु, यावर्षी ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या खर्चात कपात करावी लागत असून गोड पदार्थांच्या आवडीलाही मुरड घालावी लागत आहे. त्यात गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे उत्सव तोंडावर असल्याने जनतेच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.
००००००००००००००००
जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - १३७० क्विंटल
सणासुदीत मागणी वाढली
सद्यस्थितीत सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. गणेशोत्सव, गौरी पूजन तोंडावर असून, त्यानंतर काही दिवसांतच दुर्गोत्सव, विजया दशमी, दिवाळी, हे सण साजरे केले जाणार आहे. गणेशोत्सवात मोदक, प्रसादाचे पदार्थ, गौरीपूजनात आंबिल, हलवा आदी पदार्थ केले जातात. त्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे.
००००००००००००००००००००००
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी - ३४.५०
फेब्रुवारी - ३४.५०
मार्च - ३४
एप्रिल -३४.५०
मे - ३४
जून - ३४
जुलै - ३५
ऑगस्ट - ३६
सप्टेंबर ४१
का वाढले भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. परंतु ब्राझीलमधील दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन घटले असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील ग्राहक आता भारताकडे वळल्याने साखरेचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यातही आणखी दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती साखर व्यापाऱ्यांनी दिली आहे.
महिन्याचे बजेट वाढले
श्रावणापासून सणासुदीचा काळ सुरू होतो. त्यामुळे साखरेच्या पदार्थांचे प्रमाणही वाढत असल्याने साखरेचा वापर वाढला आहे. आता पुढे गणेशोत्सव आणि गौरीपूजन उत्सवातही साखरेचा वापर होणार आहे. साखरेचे भाव वाढल्यामुळे स्वयंपाकघराचे बजेटही बिघडले आहे.
- यमुनाबाई गडबडे, गृहिणी
दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना त्यात आता त्यात साखरेचीही भर पडली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असून, सणासुदीतही साखर जपून वापरावी लागत असल्याने गोड पदार्थ कमी प्रमाणात करावे लागत आहेत.
- पूजा भवाने, गृहिणी