सर्पमित्रांनी चार दिवसांत पकडले १६ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:16+5:302021-03-18T04:41:16+5:30
मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशन ही संघटना जैवविविधतेचे महत्त्व जनतेला पटवून देतानाच, वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य गेल्या सहा ...

सर्पमित्रांनी चार दिवसांत पकडले १६ साप
मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशन ही संघटना जैवविविधतेचे महत्त्व जनतेला पटवून देतानाच, वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य गेल्या सहा वर्षांपासून करीत आहे. या संघटनेच्या सदस्यांनी आजवर रस्ता अपघातासह, कुत्र्यांच्या हल्ल्यात, विहिरीत पडल्याने किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यजिवांवरही त्यांनी उपचार करून कित्येक वन्यप्राण्यांना जीवदानही दिले आहे, शिवाय हजारो सापांना जीवदान देतानाच, मानव-साप संघर्षावर प्रभावी नियंत्रण मिळविले आहे. त्यात रविवार, १४ मार्च रोजी मानोरा शहर व तालुक्यातील बेलोरा, चाकूर, कोलार, मंगरुळपीर शहर तालुक्यातील वनोजा, गोगरी, येडशी आणि शहापूर येथे आढळून आलेल्या एकूण १६ सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. त्यात सहा नागांसह एक कुकरी, एक कवड्या, एक रुखई आणि गवत्या जातीच्या सापांचा समावेश होता.
--------------
दीड महिन्यांत पकडले ५७ साप
निसर्ग स्पर्श फाउंडेशन संघटनेच्या सदस्यांनी ग्रामीण आणि शहरी भागांतील शाळा, महाविद्यालयात गतवर्षापर्यंत शिक्षक, विद्यार्थ्यांना सापांची माहिती देतानाच, जैवविविधतेत सापांचे असलेले महत्त्वही पटवून दिले. आजवरच्या सहा वर्षांत संघटनेने हजारो साप पकडले आहेत. त्यात मण्यार, घोणस, नाग या जहाल विषारी सापांसह विविध प्रकारच्या निमविषारी आणि बिनविषारी सापांचाही समावेश होता. या संघटनेने १ फेब्रुवारी ते १७ मार्च या ४५ दिवसांच्या कालावधीतच ५७ साप पकडून त्यांना जीवदान देण्याची किमया साधली आहे.