आरओ प्लांट बंद; नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:19+5:302021-08-23T04:43:19+5:30
संतोष वानखडे वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध ...

आरओ प्लांट बंद; नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा
संतोष वानखडे
वाशिम : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, सद्यस्थितीत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमधील आरओ प्लांट बंद असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार तसेच साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्ह्यातील ४९१ पैकी जवळपास ३०० च्यावर ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीतून आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. परंतु, अल्पावधीतच अनेक आरओ प्लांट बंद पडले. बंद पडलेले आरओ प्लांट काही ग्रामपंचायतींनी सुरू केले तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित करून बंद असलेले आरओ प्लांट त्वरित सुरू करण्याकडे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर बंद पडलेले आरओ प्लांट तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. देसाई यांनी दिले. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीदेखील आढावा घेत आरओ प्लांट सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. तथापि, ग्रामपंचायतींनी बंद पडलेले आरओ प्लांट सुरू करण्याकडे अद्यापही दुर्लक्षच चालविले असल्याचे दिसून येते. आरओ प्लांट बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्याने तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
०००००००००००
नागरिकांच्या तक्रारींची दखल केव्हा घेणार?
ग्रामपंचायतींनी सुरू केलेले काही आरओ प्लांट बंद पडल्यासंदर्भात नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटणी, पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रारी केल्या. जिल्ह्यातील काही गावात बंद असलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ प्लांट त्वरित दुरुस्त करून ग्रामस्थांना तेथून पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी १५ ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र, अद्यापही काही गावात आरओ प्लांट सुरू न झाल्याने तक्रारींची दखल केव्हा घेणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
००००००००००००००००००
दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर?
पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. सध्या तापाने जिल्हा फणफणत असून, दूषित पाण्यामुळे यामध्ये आणखीच भर पडण्याची चिन्हे आहेत. दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवले तर याला ग्रामपंचायतींचे दिरंगाईचे धोरणच कारणीभूत राहील, असा इशाराही गावक-यांनी दिला.
००००००००००००००००
कोट बॉक्स
१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लांटची सुविधा उपलब्ध केली. काही ठिकाणी आरओ प्लांटमध्ये बिघाड झाल्याने बंद पडल्याबाबत तक्रारी होत्या. बंद पडलेले आरओ प्लांट दुरुस्त करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आढावा घेतला असून, संबंधितांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी.
- डॉ. श्याम गाभणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम