वाशिमच्या ठाणेदारांची तत्काळ बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST2021-09-11T04:43:03+5:302021-09-11T04:43:03+5:30
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यमान ठाणेदार बावनकर यांनी कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना दमदाटी करणे ...

वाशिमच्या ठाणेदारांची तत्काळ बदली करा
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यमान ठाणेदार बावनकर यांनी कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना दमदाटी करणे आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे असे उपद्व्याप केले आहेत. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी जनतेच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले असता उद्धट वर्तन करून, अपमानास्पद शब्द वापरून ते दमदाटी करतात. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा जनतेत डागाळत आहे. सध्याचा काळ हा सण उत्सवांचा असून वाशिम शहर परंपराप्रिय आणि संवेदनशील आहे. ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता बावनकर यांची वाशिम येथून बदली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकर वानखेडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, शिवसेना शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, भाजपा शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शे. ताजू शे. मजिद, शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक राजू वानखेडे, गोविंद वर्मा, माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे, नगरसेवक राजू जानीवाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.