उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:47+5:302021-03-17T04:42:47+5:30

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने ...

Immediate arrest of camel smugglers! | उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या!

उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या!

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यासोबतच उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या, असे निर्देश दिले.

राजस्थान येथून उंटांची तस्करी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. उंट चोरी करून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जातात. मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून सहा उंटांचा कळप घेऊन महू येथील योगेश हुकमचंद प्रजापती व मुखेड, जिल्हा नांदेड येथील भीमराव बुद्धू राठोड हे दोघेजण रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास अमरावती - हैद्राबाद महामार्गावरून कारंजा ते मंगरूळपीरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती जाणून घेतली. यावेळी संबंधित दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, मध्यप्रदेशातील महू येथून परतवाडा जंगलमार्गे कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग, खंडाळा व यवतमाळच्या सीमा भागातून छुप्या व आडमार्गाने पायी प्रवास करत थेट हैद्राबाद येथील कत्तलखान्यात उंटांची रवानगी करण्यात येते व कत्तलीनंतर मांस व कातड्याचीही विक्री केली जाते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताना सर्व संबंधित ठाणेदारांना कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.

.................

बॉक्स :

दोन वर्षांपूर्वी झाली होती कारवाई

दोन वर्षांपूर्वी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातूर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटांचा कळप अडवून पातूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावरून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही १७ डिसेंबर २०१९ रोजी सुमारे २५ ते ३० च्या संख्येत उंटांचा कळप वाशिम शहरातून रात्रीच्या वेळी हिंगोलीच्या दिशेने रवाना होऊन तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गेल्याची माहिती आहे आणि आता १४ मार्च रोजी दोघेजण सहा उंटांसह मार्गक्रमण करताना आढळून आले आहेत.

...............

बॉक्स :

आंध्रात गेलेले उंट परतलेच नाहीत

राजस्थान येथून दरवर्षी शेकडोंच्या संख्येत उंटांचे कळप महाराष्ट्रातील विदर्भातून आंध्रप्रदेशात नेले जातात. मात्र, मागील ५० वर्षांपासून दक्षिणेकडे गेलेले लाखोंच्या संख्येतील उंट परतीचा प्रवास करून राजस्थानात जाताना कधीच आढळले नाहीत. त्यामुळे उंटांची तस्करी करून कत्तल केली जात असल्याचे स्पष्ट होते. आता उंट चोरट्यांनी आपला मार्ग बदलून अकोला जिल्ह्यातील पातूरमार्गे न येता परतवाडा, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग या रस्त्याने जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

Web Title: Immediate arrest of camel smugglers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.