दुबार पेरणी करणार्या शेतकर्यांचा तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: August 8, 2014 00:40 IST2014-08-07T22:15:58+5:302014-08-08T00:40:59+5:30
आर्थिक मदतीची मागणी : शेकडो शेतकर्यांची हजेरी

दुबार पेरणी करणार्या शेतकर्यांचा तहसीलवर मोर्चा
मानोरा : मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुबार पेरणीसाठी एकरी १0 हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी, धरणग्रस्त शेतकर्यांना प्रमाणपत्राचे वाटप करावे यासह विविध मागण्या संदर्भात माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो शेतमजूर, शेतकर्यांचा मोर्चा तहसील कचेरीवर ६ ऑगस्ट रोजी धडकला.
शहरातील मानोरा पंचायत समितीपासून सदर मोर्चा दुपारी १२ वाजता निघाला. मोर्चा शिवाजी चौक, दिग्रस चौक मार्ग तहसील कचेरीवर डफड्याच्या तालात शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आघाडी शासन व प्रशासन यांच्या विरोधात नारेबाजी देत सदर मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.
यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य नामदेवराव पाटील होते. सभेला संबोधित करताना माजी आमदार अनंतकुमार पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचा आमदार संजय राठोड यांच्या सारखा असावा. कारण त्याने आपल्या मतदार संघातील शेतकर्यांच्या गतवर्षीची अतवृष्टी, गारपीट व भिंतीच्या पडझडीची रक्कम पूर्णपणे शेतकर्यांच्या स्वाधीन केली आणि इतरही समस्या ते तत्परतेने मार्गी लावतात. आपल्या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी मात्र शेतकरी, शेतमजुरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या होताना पाहिले. मात्र यावर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती पाहून शेतकर्याला कुटुंबासह आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. तसेच महावितरण कंपनीने येत्या ८ दिवसात तालुक्यातील शेतकर्यांचा वीज जोडणीचा प्रश्न मार्गी न लावल्यास कार्यालयात जाऊन आंदोलन उभारून सत्याग्रह करू. विद्यमान आमदार निष्क्रीय असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला आज विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्याची पाळी आलेली आहे.
यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, प्रेमसिंग नाईक, जनार्दन झळके, बाबूसिंग महाराज, डॉ.विठ्ठल घाडगे, पंकज पाल, मोतीराम पाटील आदी मान्यवरांनी मोर्चाच्या सभेला संबोधित केले. यावेळी तहसीलदार ए.पी.पाटील मोर्चास सामोरे जावून निवेदन स्वीकारले.
सभेचे संचालन संजय महाराज यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विठ्ठल घाडगे यांनी तर आभार हुसेन मंत्री यांनी केले.