गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार निसर्गाच्या अनियमितेचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान केले असतानाच बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यात शासनाने मध्यम धाग्याच्या कपाशीला प्रतिक्विंटल ५६१५, तर लांब धाग्याच्या कपाशीला ५७२५ रुपये प्रतिक्विंटल हमीदर घोषित केला असताना बाजारात अवघ्या ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दराने कपाशीची खरेदी केली जात होती. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली. त्यात सुरुवातीला मंगरुळपीर, अनसिंग येथे तर त्यानंतर कारंजा येथे दोन, कामरगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी एक केंद्रही सुरू केले. कारंजा, मंगरुळपीर आणि अनसिंग येथील केंद्रावर सुरुवातीला विक्रमी आवक झाली. त्यानंतर मात्र खासगी बाजारात कपाशीचे दर वाढू लागल्याने शासकीय केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ करणे सुरू केले. परिणामी, गेल्या पाच दिवसांपासून शासकीय केंद्रावर एक क्विंटल कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही, तर १९ नोव्हेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यानच्या काळात सर्व शासकीय केंद्रांवर मिळून केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटल कापसाची खरेदी होऊ शकली आहे.
--------
३११० शेतकऱ्यांनी कापूसच आणला नाही
जिल्ह्यातील पाच शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मिळून ७९२४ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४६०५ शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणला आणि त्यांच्या कापसाची मोजणीही करून घेण्यात आली. तथापि, खासगी बाजारात ५९०० ते ६००० जार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात असल्याने ३११० शेतकऱ्यांनी अद्याप शासकीय केंद्रावर कापूसच खरेदीसाठी आणला नाही.
---------
तालुका खरेदी
कारंजा- २५०००
कामरगाव- १६२०
मानोरा- ४.१६
मं.पीर- ५०४१०.५५
अनसिंग- ३७८०१.१५
---------------------
एकूण- ११४८३५.८६