नगरपरिषदेला शहरातील प्रभाग स्वच्छतेचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST2021-09-04T04:48:42+5:302021-09-04T04:48:42+5:30
घंटागाडी ही अनियमित असल्याने साचत आहे घरातील कचरा नंदकिशोर नारे वाशिम : काेराेना संसर्ग संपुष्टात आला ...

नगरपरिषदेला शहरातील प्रभाग स्वच्छतेचा विसर
घंटागाडी ही अनियमित असल्याने साचत आहे घरातील कचरा
नंदकिशोर नारे
वाशिम : काेराेना संसर्ग संपुष्टात आला असला तरी विविध आजाराने डाेके वर काढले आहे. एकीकडे आराेग्य विभागाकडून स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत असताना शहरातील विविध भागात घाण कचरा पडला असताना नगरपरिषदेला स्वच्छतेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहरातील काही भागाची पाहणी केली असता शहरातील अनेक भागामधील स्वच्छता दैनंदिन केल्या जात नसल्याचे दिसून आले. काही भागात तर चक्क घाणीमुळे वराहांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. नाल्या तुडुंब घाणीने भरल्या असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. काही भागात नाल्या स्वच्छ केल्या जात आहेत तर नालीतून निघणारा कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकून दिल्या जात असल्याचे दिसून आले. नागरिकांचे आराेग्य अबाधित रहावे याकरिता नगरपरिषदेने लक्ष देऊन शहराची स्वच्छता केल्या जाईल याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
---------------
मुख्याधिकारी म्हणतात....
शहराची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना नगरपरिषदेच्या स्वच्छता व आराेग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून स्वच्छताही केल्या जात आहे. नगर परिषदेकडे स्वच्छता केल्या जात नसल्याच्या तक्रारी नाहीत. तरी कुठे अडचण असल्यास नगर परिषदेशी संपर्क करावा.
- दीपक माेरे, मुख्याधिकारी नगरपरिषद वाशिम
---------
हे घ्या पुरावे
अल्लाडा प्लाॅट
वाशिम शहरातील अल्लाडा प्लाॅट परिसरामध्ये घराच्या बाजूला काही नागरिक कचरा टाकत आहेत. येथे वराहांचा मुक्तसंचार असून ते घरात सुध्दा शिरत असल्याचे दिसून आले. या भागातील नागरिक त्रस्त आहेत.
नवीन आयुडीपी
नगरपालिकेने स्थापन केलेल्या नव्या आयुडीपी काॅलनीमध्ये चक्क अनेक दिवसांपासून नाल्या स्वच्छ करण्यात न आल्याने नागरिकांच्या घरासमाेर पाणी तुंबून दिसून आले. या भागात नाली स्वच्छ करणार जात नाही.
-----------
नालीतील कचरा रस्त्यावर
शहरातील काही भागामध्ये नाल्या उघड्या असून या भागातील कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता केल्यानंतर त्यामध्ये निघालेला कचरा, घाण रस्त्याच्या कडेलाच टाकून दिल्या जात असल्याने राेगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----
आमच्या भागातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात न आल्याने त्यामध्ये घाण कचरा तुंबल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे.
-तेजराव वानखडे,
आयुडीपी काॅलनी , वाशिम
आमच्या भागात दरराेज स्वच्छता करणारे येत नाही. घंटागाडी सुध्दा रस्त्यावर उभे राहून कचरा संकलन करते. हाॅटेल व्यावसायिकांचा कचरा मात्र हाॅटेल जवळ जाऊन घेतला जाताे. नव्या रस्त्यांनी साेय झाली आहे.
-नागेश काळे,
दत्त नगर, वाशिम