कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:25 IST2021-05-18T11:24:58+5:302021-05-18T11:25:03+5:30
Washim News : १ एप्रिल ते १३ मे, २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले.

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असून, या दरम्यान जिल्ह्यात जन्मदरात घट आल्याचे समोर आले. सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ५३६२ बाळांचे, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले असून, १ एप्रिल ते १३ मे, २०२१ या कालावधीत केवळ २० बाळांचे जन्म झाले.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या लाटेत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढली. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध असल्याने लग्न समारंभावरही मर्यादा आल्या. गर्भवती महिलांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने अनेक जण पाळणा लांबवीत असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षात ५,३६२ बाळांचे जन्म झाले, तर २०२०-२१ या वर्षात ४,७७१ बाळांचे जन्म झाले आहेत.
लग्नांची संख्या घटली
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेत लग्नसमारंभाला ५० व्यक्तींची उपस्थिती अशी मर्यादा होती. दुसऱ्या लाटेत आता केवळ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकावा, असे आदेश आहेत. त्यामुळे लग्नांची संख्या घटल्याचे दिसून येते.
जन्म दरात झाली घसरण
सन २०१९-२० च्या तुलनेत सन २०२०-२१ या वर्षात जन्मदरात घट झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीवरून दिसून येते. जवळपास ५९१ ने जन्म दरात घसरण झाली आहे.