ऑटोरिक्षाचालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:57+5:302021-02-13T04:39:57+5:30
वाशिम जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो ...

ऑटोरिक्षाचालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ
वाशिम जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो लोक ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर बसस्थानक, शहरांतील मुख्य चौकात तासन्तास प्रवाशांची वाट पाहणे किंवा ग्रामीण भागांत नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोरिक्षाचालकांची मोठी धडपड होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळते. त्यात कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. आता तो सुरळीत होण्यापूर्वीच शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पूर्वीच्या दरात प्रवाशांची वाहतूक करणेच परवडणारे राहिले नाही. जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या ७६९० झाल्याने प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे या रिक्षाचालकांना आता ऑटोरिक्षा चालविणेच कठीण झाले आहे. दिवसभर ऑटो फिरवून २०० रुपयेसुद्धा कमाई होत नसल्याने अनेकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत. त्यात काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे.
--------
दरवाढीमुळे व्यवसाय कठीण
वाशिम शहरात बसस्थानकाहून जवळपास एक, दोन किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिप्रवासी दहा रुपये भाडे ऑटोरिक्षाचालक घेतात. अशीच स्थिती जिल्हाभरात आहे. तथापि, एवढ्या अंतरात दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे रिकामा ऑटो घेऊन यावे लागते. यात अकारण पेट्रोल, डिझेल जळते. इंधनाचे वाढते दर पाहता रिक्षचालकांचा व्यवसायच कठीण झाला आहे.
---------
दिवसभरात २०० रुपये कमाई
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने पूर्वीच्या दराने प्रवाशांची वाहतूक करणे ऑटोरिक्षाचालकांना परवडणारे राहिले नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० ते ५०० रुपयांपर्यंत कमाई होत असे; परंतु आता मात्र २०० रुपये कमाई होणेही कठीण असून, प्रवाशांना अधिक रक्कम मागितल्यास ते दुसऱ्या ऑटोकडे धाव घेत असल्याने मिळेल, त्या पैशांत त्यांना प्रवासी न्यावे लागतात.
---------
कोट: गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली. रिक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रिक्षा चालविणे कठीण झाले आहे. भाड्यात वाढ केली, तर प्रवासी मिळत नाहीत. नाईलाजास्तव पूर्वीच्या भाड्यातच प्रवाशांना न्यावे लागते. हे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑटोरिक्षा चालवून इतर कामे करावी लागत आहेत.
- अनिक खान (12६ँ16)
रिक्षाचालक, मंगरुळपीर
-----------
कोट: पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. प्रवासी भाडे मात्र पूर्वी एवढेच आहे. त्यामुळे हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही. दोन किलोमीटर अंतरासाठी प्रत्येकी १० रुपयेप्रमाणे २ प्रवासी घेऊन गेल्यानंतर रिकामे परत यावे लागते, तर ऑटोरिक्षांची संख्या अधिक असल्याने दुसरी फेरी मारण्यासाठी प्रवासीही मिळत नाहीत. प्रत्येकी फेरीला उगाच इंधन जळत असल्याने हा व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत आहे.
-उत्तमराव पाईकराव
रिक्षाचालक, वाशिम
----
कोट: गेल्या महिनाभरात डिझेलचे दर ८२ रुपयांवर पोहोचले. प्रवासी भाड्यात मात्र काहीच वाढ झाली नाही. दिवसभर प्रतीक्षा करून दहा फेऱ्यांसाठीही प्रवासी मिळणे कठीण आहे. त्यामुळे सकाळी ११ नंतर ऑटोरिक्षा चालवितो, तर त्यापूर्वी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकतो. पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता हा व्यवसाय परवडणारा राहिला नाही.
-शेख नवेद, शेख रशिद
रिक्षाचालक, मंगरुळपीर