नैसर्गिक आपत्तीनंतर आढळतेय सोयाबीनमध्ये भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:12+5:302021-09-25T04:45:12+5:30
इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर ...

नैसर्गिक आपत्तीनंतर आढळतेय सोयाबीनमध्ये भेसळ
इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, या संदर्भात तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे पथक, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणीही केली. त्यातही या पिकात भेसळयुक्त झाडे आढळून आली आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी यंदा विविध नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवर्षण आदिमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता सोयाबीनच्या बियाण्यांत भेसळ असल्याचे झाडांच्या पाहणीतून शेतकऱ्यांना आढळून आले आहे. इंझोरी येथील शेतकऱ्यांनी कारंजा येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या नामांकित कंपनीच्या बियाण्यांची यंदा पेरणी केली होती. त्यात भेसळ दिसल्याने इंझोरीतील शेतकरी गोपाल बळीराम पायघन, गणेश हळदे, संतोष काळेकर, गजानन ढोक आणि डिंगाबर राऊत या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के, सत्यकाम मकासरे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली. त्या पाहणीनुसार सोयाबीन पिकात ७५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले आहे.
--------------
२४ एकरात आढळून आला प्रकार
इंझोरी येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे चांगले उगवले, परंतु आता या पिकाला लागलेल्या शेंगा आणि झाडांचे प्रकार वेगळे दिसत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली, या तक्रारीनुसार पथकाने पाहणी केली असता २४ एकरात हा प्रकार आढळला आहे.
-------------
७५ टक्के भेसळयुक्त झाडे
इंझोरीतील पाच शेतकऱ्यांनी मूळ ज्या सोयाबीन वाणाचे बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली. त्या वाणाऐवजी इतर सोयाबीन वाणाची ७५ टक्के झाडे त्यांच्या शेतात उगवल्याचे कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना आढळून आली आहेत.
०००००००००००००
कोट: यंदा कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून चार एकरात पेरणी केली. आता शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याची नुकसान भरपाई मिळावी.
-गोपाल पायघन,
शेतकरी, इंझाेरी
०००००००००००००
कोट: कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून सहा एकरात पेरणी केली. हे बियाणे चांगले उगवले, परंतु शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
-गजानन ढोक,
शेतकरी, इंझाेरी