५३ बसफेऱ्या रद्द, हजारो प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:47+5:302021-03-04T05:17:47+5:30
गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेकच झाला आहे. दरदिवशी सरासरी १५० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत ...

५३ बसफेऱ्या रद्द, हजारो प्रवाशांना फटका
गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेकच झाला आहे. दरदिवशी सरासरी १५० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवावगळता व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू ठेवली जात आहेत. या वातावरणात एस. टी.तून प्रवास करणाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याची भीती असल्याने, तसेच काही ठिकाणी प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नसल्याने विभागीय नियंत्रकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील चारही आगारांतील बसफेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दरदिवशी विविध ठिकाणी जाणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत असून, लांब पल्ल्याच्या बहुतांश बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने शेकडो प्रवाशांना टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही बसगाड्यांत मोठी गर्दीही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
------------------------
...या मार्गांवरील लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे एस. टी.च्या बसफेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यात अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने वाशिम जिल्ह्यातून अमरावती, यवतमाळ, नागपूरकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. त्याशिवाय भुसावळ, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बसगाड्यांची संख्याही कमी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे नियोजन त्यामुळे करावे लागत आहे.
------------------------
चालक - वाहकांची केवळ हजेरी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूूमीवर काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने चालक - वाहकांची आवश्यकता कमी झाली आहे. त्यामुळे ज्या चालक - वाहकांना कामगिरीवर पाठविले जात नाही. त्या चालक - वाहकांना लॉकडाऊन हजेरीच्या शिर्षकाखाली आगारात बोलावले जात असून, विभागीय वाहतूक नियंत्रकांच्या निर्देशानुसार त्यांची स्वतंत्र नोंद केली जात आहे.
-----------------------
कोट:
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही फेऱ्या क मी करण्यात आल्या आहेत. तथापि, काही चालक - वाहकांना लॉकडाऊन हजेरीसाठी बोलावले जाते. काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभत आहे. त्यामुळेही बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर बसफेऱ्या पूर्ववत होणार आहेत.
- विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम
-----------------------
कोट: कोरोना संसर्गामुळे नियमित फेऱ्यांपैकी काही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या निर्देशांचे पालन करून हा निर्णय घेण्यात येत असून, फेऱ्या कमी झाल्याने काही चालक-वाहकांना हजेरीसाठी बोलावून परत पाठविले जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व बसफेऱ्या आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येतील.
- आर. एस. राजनकर,
प्रभारी आगारप्रमुख, मंगरूळपीर
-----------------------
जिल्ह्यातील आगारांची संख्या ४
वाहकांची संख्या ३७६
चालकांची संख्या ४१८
नियमित बसफेऱ्या १८६
बंद केलेल्या फेऱ्या ५३
------------------