विरार इमारत दुर्घटना प्रकरण, आतापर्यंत दुर्घटनेत ९ जण जखमी तर दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:06 IST2025-08-27T18:05:36+5:302025-08-27T18:06:08+5:30
विरार पूर्वेच्या विजयनगर येथे चार मजली रमाबाई अपार्टमेंट अनधिकृत इमारत आहे. ही २०१३ बांधण्यात आली होती. यात ५० सदनिका होत्या.

विरार इमारत दुर्घटना प्रकरण, आतापर्यंत दुर्घटनेत ९ जण जखमी तर दोघांचा मृत्यू
नालासोपारा (मंगेश कराळे) - विरार पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यात आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील ९ जण जखमी आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरूच आहे
विरार पूर्वेच्या विजयनगर येथे चार मजली रमाबाई अपार्टमेंट अनधिकृत इमारत आहे. ही २०१३ बांधण्यात आली होती. यात ५० सदनिका होत्या. त्यापैकी १२ सदनिका असलेला काही भाग मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास कोसळला यात मोठ्या प्रमाणात नागरिक हे ढिगाऱ्याखाली अडकले.
वसई विरार महापालिकेचा अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांच्या दोन तुकड्या यांच्या मार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
जखमीमध्ये संजय सिंग (२४), मिताली परमार (२८) यांना मुंबई खार रुग्णालयात तर प्रदीप कदम ( ४०) जयश्री कदम (३३) विशाखा जोएल (२४), मंथन शिंदे (१९) यांना प्रकृती रुग्णालयात, प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०) नालासोपारा येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. तर या घटनेत आरोही ओंकार जोएल (२४), उत्कर्षा ओंकार जोएल (१) या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.