धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:35 IST2025-10-07T12:28:19+5:302025-10-07T12:35:48+5:30
विरारमध्ये दोन मित्रांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री दहा च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मिळालेली माहिती अशी, विरार पश्चिमेला आगाशी अर्नाळा रस्त्यावरील ओलांडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन सोमवारी रात्री या विद्यार्थ्यांनी उडी टाकली.या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. दोघांनी उडी टाकून सामूहिक आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही आत्महत्या असल्यास आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हे दोन तरुण नालासोपारा येथून आगाशी परिसरात नेमके कोणत्या कारणासाठी आले होते याबाबत अजून कोणतीही माहिती मिळलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे दोघांची ओळख पटवण्यात अडचणी आल्या. हे दोन विद्यार्थी ज्या दुचाकीवरून आले होते त्या दुचाकीवर असणाऱ्या क्रमांक पट्टीच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे हे दोन तरुण नालासोपाऱ्याच्या आचोळे येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले. श्याम सनद घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१ ) अशी तरुणांची नावे असून ते दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत होते.